Search This Blog

Tuesday, April 27, 2021

अनोळखी हे प्रेम - Part 7

             निखिलच्या डोक्यात एक मस्त प्लॅन तयार झाला होता. आता फक्त त्यानुसार सगळ्या गोष्टी झाल्या म्हणजे अभयला त्याची 'चिऊ' मिळेल, असं निखिलच्या मनात  होतं. त्याने तशी कामाला सुरुवात देखील केली होती. संध्याकाळी अभयच्या लॅपटॉप वर बसून त्याने अभयच्या फेसबुकवर तो 'चिऊ आणि म्याऊचा' फोटो टाकला आणि त्याखाली, 

'बचपन के ये दोस्त, बिछड गए युंही चलते चलते,

अधुरी रह गई इनकी दास्तां, 

कोई इनको मिलादे यारा, फिर दोनो मिल जाए हसते हसते'

असं काहीतरी आपल्या भाषेत लिहून टाकून दिले. अभय आपलं बघत होता कि, निखिल नेमकं काय करतोय. 

" अभ्या, मला एक सांग तुझ्या चिऊचं खरं नाव काय होतं?"  निखिलने एवढा वेळ आपल्या मनात असलेला प्रश्न विचारला. 

अभय आठवू लागला. पण त्याला खरंच तिचं नावंच आठवत नव्हतं. आठवत नव्हतं म्हणजे त्याला तिचं नावंच माहिती नव्हतं. मग आठवणार कसं? कारण ते एकमेकांना चिऊ आणि म्याऊच म्हणायचे, त्यामुळे त्यांची खरी नावे दोघांना पण माहिती नव्हती. 

"माहिती नाही रे निखिल." अभय खूप आठवून म्हणाला. 

"माहित नाही म्हणजे? साल्या तुला जिच्यावर लहानपणीपासून प्रेम करतोय तिचं साधं नाव पण माहिती नाही?" निखिल म्हणाला. 

"नाही माहित रे निख्या. त्याला मी तरी काय करणार, कारण आम्ही दोघेही एकमेकांना आम्ही दिलेल्या टोपण नावानेच ओळखत होतो. त्यामुळे खरं नाव माहित तरी कसं पडणार." अभय आपला मान खाली घालत म्हणाला. 

"हा बरं. चल बघतो मी काय करायचं ते आता. तुमचा फोटो तर टाकलाय मी तुझ्या फेसबुकवर. आता सेम असच तू बाकीच्या तुझ्या सोशल नेटवर्किंग साईटवर टाक. म्हणजे कुठून तरी लिंक लागेल." निखिलने अभयला सांगितले. 

"ठीके चालेल." असं म्हणून अभयने निखिलच्या  पुढ्यातील लॅपटॉप घेतला आणि निखिलने सांगितल्याप्रमाणे त्याच्या दुसऱ्या सोशल नेटवर्किंग साईटवर तो फोटो टाकला. आणि पुढे काय होतंय का त्याची वाट पाहू लागला. 

               असेच ४-५ दिवस गेले. काहीच परिणाम झाला नव्हता फोटो टाकून. उलट त्याच्या फेसबुकवरील मित्रांनी त्याची खिल्ली उडवली होती. त्यामुळे अभयला वाटलं कि ह्याचा काही उपयोग होणार नाही. त्याने निखिलला पण तसे सांगितले. तेव्हा निखिलने त्याला आणखी थोडे दिवस वाट बघायला सांगितले. लगेच काही अशा गोष्टी घडत नसतात. तेव्हा अभयकडे आणखी वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याची बेचैनी आणखी वाढत चालली होती. त्याला मनातून असंच वाटत होतं कि, लवकरात लवकर काहीही करून आपली चिऊ आपल्याला मिळायला हवी. पण ती अशी मिळेल का, ह्याबद्दल त्याला डाऊटच होता. पण तरीही, प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे म्हणून तो गप्प बसला. दिवस जात होते. पण त्याचा काही फायदा होत नव्हता. म्हणून त्याने निखिलला शिव्या घालत तो विषय सोडून दिला. 

                एके दिवशी सकाळी बागेतल्या खुर्चीवर अभय विचार करत बसला होता. 'मिशन चिऊ' तर चालूच होतं. हे खूप महत्वाच होतं त्याच्यासाठी, कारण ते त्याचं लहानपणीचं प्रेम होतं. आणि अचानक त्याला ऋतिकाची आठवण झाली. चिऊच्या नादात तो ऋतिकाला विसरला होता थोडा वेळ. पण आता त्याला परत तिची आठवण आली. काहीतरी आठवून त्याने आपला मोबाईल घेतला आणि त्यात काहीतरी शोधू लागला. पण त्याला काही मिळेचना. ऋतिकाने दिलेला नंबर शोधत होता तो. तिला फोन करण्यासाठी. पण गडबडीत त्याने तिचा नंबर सेव्ह सुद्धा नव्हता केला आणि ज्यावर तिने तो मोबाईल  नंबर लिहून दिला होता तो कागद देखील कुठे तरी हरवला होता. आता बोंबला. कारण त्यादिवशी इकडे येताना जेव्हा तिच्या घरी गेलो होतो, तेव्हा फोन नाही केला म्हणून किती चिडली होती. जसं काय ह्याच्याशी जुनी ओळख आहे तिची आणि आपल्या जवळच्या मित्राने फोन नाही केला म्हटल्यावर जसं चिडतात तशी त्याच्यावर चिडली होती ती. ते आठवून त्याला हसायलाच आलं. पण आपण साधा तिचा नंबरपण सेव्ह नाही केला म्हणून त्याने स्वतःलाच शिव्या घातल्या आणि आता निखिल घालणार त्या वेगळ्याच. 

           त्याला तिची खूप आठवण येत होती. माहित नाही का ते, पण तिचाच सारखा विचार येत होता मनामध्ये. कारण त्याला कुठेतरी असं वाटत होतं, कि हि ऋतिकाच त्याची चिऊ आहे म्हणून. पण त्याला खात्री नव्हती. पण त्याचं मन सारखं तेच सांगत होतं. कारण जेव्हा जेव्हा तो तिला भेटला होता, तेव्हा तेव्हा त्याला तिच्याविषयी एक अनामिक ओढ वाटत होती. तिच्याशी जुनी ओळख वाटत होती. पण त्यावेळीस त्याला चिऊची आठवण न येणं, हे मात्र खटकलं. जर ह्या दोघी वेगळ्या असतील तर आपण आपल्या लहानपणीच्या प्रेमाला फसवत असल्याची भावना त्याच्या मनात आली. मनातल्या मनात तो खजील झाला. ह्या सगळ्या गोष्टींचा त्याला लवकरात लवकर शोध लावायचा होता. पण कसं, हे त्याला उमजत नव्हतं. 

"काय साहेब, कसला विचार करताय एवढा?" निखिलने अभयला आल्या आल्या विचारले. 

विचारांच्या तंद्रीतून बाहेर येत त्याने निखिलकडे पहिले तर तो त्याच्या कडेच बघत होता. 

"काही नाही रे असच" अभय काहीतरी बोलायचं म्हणून म्हणाला. 

"सांग रे, उगाच काही लपवायच्या भानगडीत पडू नकोस उगाच. सांग मुकाट्याने." निखिलने एक टपली त्याच्या डोक्यात मारत म्हटले. 

आता ह्याला सांगावंच लागणार म्हणून अभयने एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाला,

"चिऊ आणि ऋतिकाचा विचार करत होतो."

"वाटलंच होतं मला कि, हे बेणं हाच विचार करत असणार म्हणून." निखिल आपले दोन्ही हात डोक्याजवळ नेत खुर्चीत रेलून बसत म्हणाला,

"काय काय विचार केलात मग आपण नेमका."

"यार निख्या हे बघ, मी जेव्हापासून ऋतिकाला पाहिलंय, तिला भेटलोय तेव्हापासून मला तिच्याबद्दल एक अनामिक ओढ वाटतेय. असं वाटतंय कि, ती माझी खूप जुनी मैत्रीण आहे. मी तिला खूप आधीपासून ओळखतोय. पण तसं बघायला गेलं तर चिऊनंतर माझी कुठलीच मैत्रीण नाहीय. त्यामुळे हे शक्य नाहीय. आणि जर ती चिऊ असती तर तिने मला लगेच ओळखलं असतं किंवा मी तरी तिला ओळखलं असतं "

"हा, पण तुझी चिऊ आणि तू खूप लहान होता ना, जेव्हा तुम्ही लोकांनी ते ठिकाण सोडलं तेव्हा. मग तेव्हा आणि आता तुझ्यात आणि तिच्यात काही बदल झाला असेल का नाही? कि तुम्ही दोघे पण आता तसेच दिसणार आहेत लहानपणीसारखं?" निखिलने विचारले. 

"हो, बदलेलं तर असू." अभय भोळसटपणे म्हणाला.   

"मग लेका कसं ओळखणार ती तुला."

"यार पण तरी सुद्धा तिने ओळखलं असतं मला."

"हो बरं. जर तिने तुला ओळखलं असतं आणि जर ती ऋतिकाच चिऊ असती तर तिने लगेच तुला मिठी मारली असती किंवा निदान ओळख तरी दाखवली असती." निखिल म्हणाला. 

"हो, ते पण आहेच."

"मग कशावरून तू असं म्हणत होतास अभ्या?" निखिलने अभयला प्रश्न केला. 

"निख्या माझं मन म्हणतंय तसं. राहून राहून मला सारखं हेच वाटतंय कि, ऋतिकाच चिऊ आहे म्हणून. ते तिला विचारणार होतो मी पण गडबडीत नाही जमलं ते आणि आता तिला कॉल करायला मोबाईल घेतला तर..." अभय मधेच थांबत म्हणाला. 

"तर काय अभ्या?" निखिलने प्रश्नार्थक नजरेने अभयकडे पहिले. 

"तर तिचा नंबरच नाहीय माझ्याकडे." अभय हताशपणे म्हणाला. 

"काय?" निखिल जवळ जवळ ओरडलाच, "अरे तिने दिलेला ना तिचा मोबाईल नंबर."

"हो दिलेला, पण मी तो तेव्हा सेव्ह नव्हता केला. म्हणजे माझ्या लक्षात नव्हतं राहिलं आणि ज्यावर तिने तो लिहून दिलेला तो कागद पण हरवलाय."

"अरे देवा. धन्य आहात तुम्ही अभय साहेब. खरंच धन्य आहात. काय फायदा रे तुझा एवढा हुशार असून साल्या. खाल्लीस ना माती शेवटी. तुला साधा एक मोबाईल नंबर जपून ठेवता नाय आला. तो पण एका मुलीने दिलेला. च्यायला आम्ही इकडे तरसतो मुलींनी आम्हाला मोबाईल नंबर द्यावा म्हणून आणि तू, तू तर स्वतःहून मुलीने दिलेला मोबाईल नंबर हरवून बसला आणि तो पण कोणाचा तर जिच्यावर प्रेम करतो तिचाच. वा भाई. आपके चरण कहा है प्रभू ." असं म्हणून निखिल अभयच्या पाय पडायला खाली वाकला. 

अभयला माहिती होतं निखिल त्याच्यावर भडकणार ते. म्हणून तो त्याला हे सांगणार नव्हता. पण बोलता बोलता तो नकळत बोलून गेला आणि आता त्याच्या शिव्या खात होता. 

"अरे निख्या नाही राहिलं लक्षात तेव्हा. मी तिच्याच विचारांत होतो तेव्हा." अभय आपलं सारवासारव करत होता. त्याला माहिती होतं कि निखिल आता काय त्याला सोडणार नाय. त्याला पार पिळून काढणार. 

"हो का. अरे माणसा मग निदान माझ्याकडे तरी द्यायचा. मी तरी ठेवला असता ना सांभाळून. तुला कदरच नाय रे मुलींची. आता बस बोंबलत" निखिल अभयवर उखडतच होता. त्याच्या मते अभयने फार अक्षम्य गुन्हा केलेला होता. 

"ओ कदरदार. हो देणारच होतो, पण तेव्हाच हरवला तो." अभय म्हणाला. 

"अच्छा म्हणजे माझ्याकडे द्यायचा म्हणून हरवला कि माझ्याकडे देण्याअगोदर हरवला. हा" निखिल म्हणाला. 

"अरे तुझ्याकडे देण्याअगोदर रे निख्या" अभय आपलं बचावकार्य करत होता. 

"च्यायला अभ्या, काय तू पण?" निखिल म्हणाला. 

"अरे मला काय माहिती असं होईल म्हणून. आणि तसंही मला काय सवय नाय ना तुझ्यासारखी असल्या गोष्टींची." अभयने निखिलच्या नसेवर दाबलं. 

"हो ना, तरीच म्हटलं अजून मला कसं काय नाय बोलला अजून ते." निखिल अजूनच चरफडला. 

"मी सांगतोय रे फक्त, तुला नाय काय बोलत आहे निख्या" अभय आपलं येणारं हसू दाबत म्हणाला. 

"कळतं रे अभ्या, मला कळतं सगळं साल्या. एकतर तुमची मदत करा आणि वरतून तुमचीच बोलणी ऐका. भलाईका जमानाच नहीं रहा अभी तो" निखिल नाटकी आवाज करून म्हणाला. तसं अभयला हसू फुटलं. 

"बरं बास रे बाबा, आता किती बोलशील अजून. सॉरी यार. पुढल्या वेळी लक्षात ठेवीन." अभय शरणागत पत्करत म्हणाला. 

"अभ्या अरे, असं नाय रे. पण असा चान्स सारखा सारखा नाय भेटत. आता कसं कॉन्टॅक्ट करणार तू तिला. ती बिचारी तुझी वाट बघत असेल आणि तू इकडे तडपतोय तिच्यासाठी. कुठेतरी जुळत आलं होतं तुमचं. आता मला बघवत नाहीय यार. एकतर आपण इकडे आलोय तुझ्या घरी. ती किती लांब आहे माहितीय ना. आणि आपण परत कधी जाणार ते पण काही सांगत नाहीस तू." निखिल अभयला समजवत म्हणाला. 

"हो जाऊयात लवकरच, इकडे ज्या कामासाठी आलोय ते झालं कि जाऊयात. थोडे दिवस थांब. तोपर्यंत हा ऋतिकाचा विषय थांबवूयात. आणि चिऊचा पण"

"मी थांबवेन रे, पण माझ्या मित्रा तू राहू शकशील का? किती बेचैन होत होतास तिच्यासाठी. बघितलंय मी तुला. कसा राहशील मग? आणि चिऊचं काय?" निखिल काळजीने म्हणाला. 

"नको काळजी करुस निख्या. जसा इतके दिवस चिऊशिवाय राहिलो तसाच आणखी थोडे दिवस राहील आणि ऋतिकाचं म्हणशील तर थोड्या दिवसांचा तर प्रश्न आहे. आधी इथलं महत्त्वाचं काम झालं कि मग चिऊ आणि ऋतिकाला शोधून नक्की त्या दोघी एकच आहेत कि वेगवेगळ्या हे क्लिअर करेन." अभय काहीतरी विचार करत म्हणाला. 

"हम्म बरं." निखिल म्हणाला. "पण कसलं महत्वाचं काम आहे अभ्या तुझं इकडं?" निखिलला अभयच्या बोलण्याचा अर्थ न समजून त्याने विचारले. 

अभय आपल्या विचारात होता, आपण नेमकं काय कामासाठी आलेलो तेच करायचं राहून गेलं होतं. आजीने आपल्याला आता हा आपला बिजनेस सांभाळण्यासाठी बोलावून घेतलं होतं. आणि त्यात निखिलची आपल्याला मदत होईल आणि तो आपल्या सोबतपण राहील म्हणून निखिलला आपल्या बिजनेस संदर्भात कामासाठी घेऊन आलेलो. त्याची आपल्याला काही मदत होईल बिजनेस साठी. बाहेरच्या गोष्टीमध्ये त्याचं डोकं तसंही भरपूर चालतं. तिकडे असता तर फुकट त्याच टॅलेंट वाया जाण्यापेक्षा त्याचं डोकं आपल्या बिजनेस मध्ये वापरलं तर त्याचाही फायदा आहे त्यात आणि आपलाही. आपल्यासोबत राहून त्याचीही प्रगती होईल आणि आपल्या मनालाही शांती होईल. आजीसोबत पण तो ह्यासंदर्भात बोलला होता. तेव्हा आजीलाही काही हरकत नव्हती. उलट तिला आपल्या नातवाचे कौतुक वाटलं. 

"अरे निख्या, तुला मी म्हटलं होतं ना, कि आपल्याला बिजनेस करायचा आहे वगैरे. आठवलं का?" अभय आपल्या विचारांच्या गराड्यातून बाहेर येत म्हणाला. 

आपल्या मेंदूवर जोर देत काहीतरी आठवून निखिल म्हणाला,

"अरे हो, तू  बोललेलास एकदा. पण त्याचं काय आता."

"हा तर त्याच संदर्भात बोलायचं आहे तुझ्याशी." अभय म्हणाला. 

"हा बोल. पण मी तर बिजनेस चालू करणार आहे पण त्याला वेळ आहे रे साल्या अजून. आधी त्यासाठी पैसा वगैरे तर जमवू दे. मग करू कि आपला बिजनेस चालू." निखिल मस्तपैकी डोक्याच्या मागे हात करून रेलून बसत म्हणाला. 

"अबे ओये. अंबानींची औलाद." अभय निखिलच्या डोक्यावर एक टपली मारत म्हणाला," मी असताना तुला दुसरा बिजनेस चालू करायची काय गरज?"

"म्हणजे?" निखिल आपलं डोकं चोळत म्हणाला. अभयची टपली जोरात लागली होती त्याला. 

"म्हणजे इकडे मी आमचा बिजनेस जॉईन करायला आलो आहे. आजीने मला त्यासाठीच बोलावून घेतलंय. एकदा एकदा का मी ह्यात सेटल झालो कि, नंतर माझी पर्सनल कामं करता येतील. आणि तुझ्यासाठी पण एक काम आहे."

"काम? म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुला." निखिलला काहीच समजत नव्हतं. 

"म्हणजे, तुझ्यासाठी एक ऑफर आहे." अभय मस्त एक स्माईल देत म्हणाला. 

"कसली रे?" निखिल न कळून म्हणाला. 

"तुला मी आपल्या बिजनेस मध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेतोय. आज आणि आता पासून. आणि आपल्याला त्यासाठीच ऑफिसला जायचं आहे काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला. आजपासून तू माझ्यासोबत काम करणार आपल्या बिजनेसमध्ये " हे सांगून अभय आपल्या हाताची घडी घालून निखिलच्या चेहऱ्यावर काय भाव येतात ते पाहू लागला. 

क्षणभर त्याचा आपल्या कानांवर विश्वासच बसला नाही. नाही म्हणजे, अभय आपल्याला त्याच्या बिजनेसमध्ये  सामील करून घेतोय आणि का? आपली तेवढी क्षमता आहे का? कारण अभयची कंपनी हि एक इंटरनॅशनल लेव्हलची कंपनी आहे. आणि तिथे काम करायला आपल्याला काही येतं तरी का ? आपलं आताच तर कॉलेज झालय. अजून रिजल्ट यायचाय. आणि हा भाऊ म्हणतोय डायरेक्ट आपल्या कंपनीत ये म्हणून. त्याचं एक ठीक आहे, त्याला जन्मजात ते स्किल्स आहेत. म्हणून तो करेल सगळं मॅनेज आणि आपलं काय? साला आपण तर त्याची कंपनी विकायला काढू? आपल्या विचारांचं त्याचं त्यालाच हसू आलं. 

"अबे ये निख्या, हसतोय काय. बोल कि काहीतरी." अभय त्याला हसताना पाहून म्हटलं. त्याला हे कळेना तो हसतोय का ते. 

"जोक भारी मारला रे तू म्हणून हसायला आलं मला." निखिल  म्हणाला. 

"जोक  नाय रे साल्या, खरं बोलतोय मी. तुला माझ्यासोबत आपल्या कंपनीत काम करायचं आहे." अभयचा निर्णय झाला होता आधीच. त्यामुळे तो निखिलचं काही जास्त ऐकून घेणार नव्हता. 

"पण अभ्या, मला काय येत नाय रे अजून काही आणि कसला अनुभव वगैरे नाहीय मग तुझ्या एवढ्या मोठ्या कंपनीत माझं काय काम? तुला तुझी कंपनी बुडवायची आहे का साल्या?" निखिलने आपल्या मनातलं बोलून दाखवलं. 

"अरे काही नाही होत. बॉबी अंकल आणि आजी आहेत सगळं शिकवायला आपल्याला. मी पण नवीनच आहे ह्या सगळ्यांत. मला तरी कुठे एवढं काय येतं." अभय म्हणाला. 

"तुझं ठीक आहे रे बाबा, तुझ्यात आधीपासून तेवढं टॅलेंट आहे त्यामुळे तू हे सगळं करू शकतोस. आपल्याला नाही जमणार हे सगळं." निखिल हात हलवत म्हणाला. 

"निख्या, च्यायला सांगितलं ना तुला एकदा. मग मुकाट्याने ऐकायचं. नायतर देईल एक ठेऊन." अभय निखिल ऐकत नाही हे पाहून रागात म्हणाला. तसा निखिल गप्प खाली बसला आणि अभयकडे  पाहू लागला. ते पाहून अभयला  हसू आलं. तसा तो नरमाईने म्हणाला,

"यार निखिल ऐक माझं, हे बघ तुला सुद्धा बिजनेस करायचा आहे आणि मला सुद्धा बिजनेसच करायचा आहे. बरोबर" 

निखिलने मान डोलावून 

"हो"  म्हटलं. 

"आणि इकडे आपल्याला तो चान्स भेटतोय. तू तुझा बिजनेस उभा करणार त्यासाठी तुला खूप मेहनत घ्यावी लागणार. खूप पैसे लागणार. वेळ लागणार. आणि तुला अजून माहित पण नाहीय कि तुला नक्की  कसला बिजनेस करायचा आहे. तुला तर फक्त बिजनेस करायचा एवढंच माहित आहे. ह्या सगळ्यांमध्ये खूप वेळ वाया जाईल आणि हाती काहीच लागणार नाही. मला माहितीय कि तु करशील बिजनेस, पण तो एका लेव्हल पर्यंत. त्यापुढे काय?" अभय निखिलला समजावत होता.

"इकडे तुला पण तेच करायचं आहे. मी काही तुला माझ्या हाताखाली वगैरे ठेवत नाहीय तर तु माझ्या सोबत राहणार आहेस आपल्या बिजनेस मध्ये. तू ज्या गोष्टी बाहेर जाऊन एकटाच धडपडून करशील त्याच गोष्टी तुला इथेही करायला भेटतील. इकडे आपल्या खूप साऱ्या कंपन्यांचे ग्रुप्स आहेत. तुला ज्या कंपनीत इंटरेस्ट आहे तू त्या कंपनीचा बिजनेस हॅन्डल कर. आपण दोघे मिळून हा बिजनेस चालवू पुढे. कारण आता आजीला जास्त लक्ष द्यायला जमत नाहीय आणि बॉबी अंकल तरी किती दिवस हॅन्डल करणार हे सगळं. त्यामुळे आपण दोघांनी जर हे सगळं आपल्या डोक्यावर घेतलं तर दोघे मिळून आपण खूप काही करू शकतो. आजी आणि बॉबी अंकल आहेतच आपल्या सोबत. ते सांगतील सगळं आपल्याला. आपलं काही चुकलं तर शिकवायला. माहितीय मला कि आपलं आताच कॉलेज झालंय आणि अजून आपल्याला कसलं नॉलेज नाहीय, पण विचार कर निखिल आपण जर ह्या  वयात  बिजनेस मध्ये इन्व्हॉल्व झालोत तर आपल्याला किती काय काय करता येईल आणि किती काही शिकता येईल. आपण आता इतके हि लहान नाही आहोत कि आपल्याला काही कळत नाहीय. आपण नक्कीच यशस्वी होऊ. विचार कर, छत्रपती शिवाजी महाराजांनी लहान वयातच स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती आणि पुढे जाऊन त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं. जर त्यांनी त्यावेळीस हा विचार केला असता कि, आपण आता लहान आहोत. आपण मोठे झाल्यावर स्वराज्य स्थापन करू. तर नंतरची परिस्थिती हि वेगळी असती. त्यांनी आलेल्या संधीचा फायदा घेऊन त्यानुसार  कामगिरी केली. म्हणूनच ते यशस्वी झाले. आणि आपल्याला सुद्धा हेच करायचं आहे. बघ विचार कर आणि सांग मला " इतकं बोलून अभय शांत झाला. 

अभयने निखिलचा क्लीन बोल्ड केला होता, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यावर त्याचा आत्मा सळसळला. त्याला अभयला नकार द्यायचं कारणच दिसेना. त्याला स्फुरण चढले.  

"चल अभ्या मी आहे सोबत. काय होईल ते बघून घेऊ आता. येत नसलं काय म्हणून काय झालं. शिकून घेऊ आपण सगळं. हा मावळा आहे तुझ्यासोबत." निखिल जोशात येऊन म्हणाला. 

"ये हुई ना बात" असं म्हणत अभयने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याचा अवतार पाहून अभयला बरं वाटलं. त्याची मात्रा बरोबर लागू पडली होती त्याच्यावर. 

                  झालं. दुसऱ्या दिवशी अभयच्या आधी निखिल तयार होऊन आला. नाश्ताच्या टेबलवर त्याची वाट पाहत बसला. थोड्याच वेळात अभय पण आला आणि त्याच्या बाजूला बसला. त्याला आपल्या आधी आलेला पाहून तो चमकला. पण काही बोलला नाही. तो पण ऑफिस ला जायला उत्सुकच होता. पण निखिल जरा जास्तच. कालचं आपलं लेक्चर आठवून त्याचं त्यालाच हसू आलं. निखिल कसली तरी फाईल घेऊन बघत होता. ते पाहून अभय त्याला म्हणाला,

"अरे वा, सकाळी सकाळी कामाला सुरुवात पण केलीस तू. क्या बात है?"

"हो मग, करायला नको. शिकायचं आहे ना सगळं, मग सुरुवात तर करायलाच पाहिजे ना." निखिल अजूनच फाईल मध्ये घुसत म्हणाला."पण साला हि फाईल कसली आहे, ते कळलं नाही अजून मला. सगळे हिरो आणि हिरोइन्स चे फोटोच आहेत राव ह्याच्यात. काय तुमची कंपनी मॉडेल वगैरेचे फोटो छापते काय?"

अभयने त्याच्या कडे बघितले आणि एकवार त्याच्या हातातल्या फाईलकडे नजर टाकली. निखिलच्या डोक्यात एक टपली मारून अभय जोरात हसायला लागला. इतका कि त्याच्या हसण्याच्या आवाजाने आजी आणि बॉबी अंकल पण लगेच तिकडे आले. 

"काय झालं रे हसायला तुला?" निखिलने अभय का हसतोय हे न कळून विचारलं. आजी आणि बॉबी अंकल 

अभयला त्याचं हसू आवरत नव्हतं. कसबसं आपलं हसू दाबत तो म्हणाला,

"साहेब, तुम्ही मघापासून जी फाईल घेऊन वाचताय ना एवढं मन लावून ती एक मॅगझीन आहे. त्यात सगळ्या बातम्या आणि हिरो हिरोइन्सचे कारनामे असतात. आपल्या कंपनीचा आणि त्या मॅगझिनचा काही एक संबंध नाहीय." असं म्हणून अभय परत जोर जोरात हसायला लागला. त्याच्या हसण्याचा अर्थ लक्षात येऊन आता आजी आणि बॉबी अंकल पण त्याच्या हसण्यात  सामील झाले. त्या सगळ्यांत निखिलचा चेहरा मात्र बघण्यासारखा झाला होता. 

                 नाश्ता करून झाल्यावर आजीने बॉबी अंकलला अभय आणि निखिल आजपासून ऑफिसला येणार आहेत हे सांगितलं. त्यांनादेखील हे ऐकून आनंद झाला. 

"अभिनंदन अभय बाळा. चला आजपासून आम्हाला आमचे नवीन साहेब मिळाले." असं म्हणून त्यांनी अभयशी हात मिळवले. 

"साहेब काय म्हणताय बॉबी अंकल, तुमच्यासाठी मी अजून तोच अभय बाळ आहे आणि कायम अभय बाळच राहणार." असं म्हणून अभय त्यांचा आशीर्वाद घ्यायला खाली झुकला. पण बॉबी अंकलनी त्याला अडवले आणि म्हणाले,

"अभय बाळा, तुमची जागा आमच्या हृदयात आहे. पायाजवळ नाही." आणि त्यांनी अभयला मिठी मारली. हे बघून आजीचे डोळे भरून आले. अभयने आजीचा आशीर्वाद घेतला. 

"यशस्वी भव: शतायुषी भव:" आजीने आपल्या नातवाला मायेने आशीर्वाद दिला. आता आपला अभय पुढच्या वाटचालीसाठी तयार झालेला पाहून आजीचा ऊर भरून आला होता. 

"अभय बाळा, आता हे सगळं तुझ्यावर सोपवतोय. माहितीय हे सगळं खूप लवकर होतंय, पण मला खात्री आहे कि तू हे व्यवस्थित संभाळशील."

"हो आजी नक्कीच." अभय आत्मविश्वासाने म्हणाला. 

निखिल हे सगळं पाहत होता. त्यालासुद्धा आपण खूप नशीबवान आहोत म्हणून आपल्याला अभयसारखा मित्र भेटला असं वाटत होतं. तेवढ्यात आजीने निखिलला आवाज दिला. 

"निखिल बाळा, अभयसारखाच तुही माझा  नातू आहेस. कायम दोघे सोबत राहा. एकमेकांची साथ कधीच  सोडू नका. आलेल्या संकटाना धैर्याने सामोरे जा आणि यश मिळवा. मला तुम्हा दोघांनाही एकत्र  यशस्वी झालेलं पाहायचं आहे." 

"हो आजी. तुमच्या म्हणण्याप्रमाणेच होईल सगळं." अभय आणि निखिल एकदमच म्हणाले. आणि त्या दोघांनी आजीचा निरोप घेतला आणि ऑफिसला जायला निघाले. आपल्या नातवाचा तिला आधीपासूनच अभिमान होता, पण आता तिची मान अभिमानाने आणखीनच उंचावली होती. 

                हळू हळू दिवस सरत होते. चार-पाच वर्ष झाले असतील. अभय आणि निखिलचा हा प्रवास तर सुरु झाला होता. ते दोघेही हळू हळू सगळ्या गोष्टी शिकत होते, आत्मसात करत होते आणि तितक्याच लवकर प्रगती करत होते. आधीचा त्यांचा असणारा बिजनेस त्यांनी अजूनच वाढवला होता. अभय अगदी मन लावून कामी करत होता आणि निखिलही त्याला मनापासून साथ देत होता. आज अभयमुळेच निखिलचं बिजनेसमॅन होण्याचं स्वप्न पूर्ण झालं होतं. त्यामुळे निखिल त्याची साथ दयायला कुठेच कमी पडत नव्हता. आजी आणि बॉबी अंकल त्याची प्रगती पाहून सुखावले होते. कारण एका राजकुमाराचे रूपांतर आता एका राजामध्ये झाले होते. निखिल त्याच्या घरी सांगून इकडेच शिफ्ट झाला होता. त्याच्या घरच्यांनी देखील आपला मुलगा चांगल्या संगतीला लागलेला पाहून त्याला परवानगी दिली होती. महिन्यातून एकदा तो त्यांना भेटायला घरी जात असे. त्याच्या घरचे देखील आनंदात होते आपल्या मुलाची प्रगती पाहून. आपला मुलगा अशी प्रगती करू शकतो याचे त्यांना नवल वाटत होते आणि तितकेच अभयचे कौतुकही. 

          अभय जेव्हापासून ऋतिकाला भेटला होता, तेव्हापसून ऋतिका एका वेगळ्याच जगात हरवलेली असायची. सारखा अभयचा विचार तिच्या मनात येत असायचा. पण लगेच तिच्या म्याऊचा विचार आला कि तो अभयचा विचार झटकून टाकत असे. का माहिती नाही, पण तिला अभयबद्दल एक वेगळीच ओढ वाटू लागली होती. कसा तो अचानक आपल्याला भेटला तेही ऍक्सीडेन्टच्या कारणाने. तेव्हाच त्याला पहिल्यांदा बघून त्याच्याबद्दल एक ओढ निर्माण झाली होती. त्याच्यात असं काहीतरी होतं कि, जे ऋतिकाला त्याच्याकडे खेचत होतं. एक अदृश्य बंध होतं त्यांच्यात. एक अनामिक ओढ होती. एक असं अनोळखी नातं होतं कि ज्याला प्रेमही म्हणू शकतो. पण ऋतिका म्याऊच्या कारणास्तव हे स्वीकारू शकत नव्हती. कारण म्याऊ तिचं पहिलं प्रेम होतं आणि ती त्याला विसरू शकत नव्हती. इतक्या वर्षांनंतरही तिचं त्याच्यावरचं प्रेम कमी झालेलं नव्हतं. तिला हेदेखील माहित नव्हतं कि, तिचा म्याऊ सध्या कुठे आहे. काय करतोय. एवढ्या वर्षांनंतर तो अजून पण तिला भेटला नव्हता. पण तिला खात्री होती कि, तिचा म्याऊ तिला एक दिवस नक्की भेटेल. जसा तो स्वतःहून दूर गेला होता, तसाच तो स्वतःहून तिला शोधत येईल. 

           म्याऊ तिच्यापासून दूर गेल्यावर ऋतिका देखील तिच्या वडिलांची बदली झाली म्हणून ते गाव सोडून दुसरीकडे राहायला गेली तिच्या कुटुंबासमवेत. तसंही तिथे राहून तिला म्याऊची सारखी आठवण येत होती. तो परत तिच्यासोबत खेळायला येईल म्हणून सारखी त्याची वाट बघत असायची. पण हळूहळू तिलादेखील कळून चुकले कि, तो आता परत कधीच येणार नाही. तिच्यापासून तो दूर कुठेतरी निघून गेला होता. तिला न सांगता. आपल्याशिवाय एक क्षणही न राहणारा आपल्याला सोडून कसा काय जाऊ शकतो, हेच तिला कितीतरी दिवस खरं वाटत नव्हतं. पण नंतर तिने आपल्या बालमनाला समजावले आणि तो परत येईपर्यंत त्याची वाट बघायची असा निरागस पण ठाम निर्णय घेतला. तिला विश्वास होता तिचा म्याऊ नक्कीच परत येईल तिच्याकडे. आणि एकदा तो परत आला कि, त्याला कुठे जाऊ नाही देणार मी. 

           तेव्हापासून आजपर्यंत ऋतिका तिच्या म्याऊची वाट बघत होती. अभयला पाहून तिला एक वेळ असच वाटलं कि,तोच तिचा म्याऊ आहे.  तिला उगाच असं वाटत होतं कि, अभय आपला खूप जवळचा मित्र आहे आणि तो सध्या आपल्याला विसरलाय. त्याच्या बद्दल  तिच्या मनात एक ओढ निर्माण झाली होती. एक आपुलकीपणा जाणवत होता. पण तिला खात्री नव्हती, कि तोच तिचा म्याऊ आहे ते. जर तो म्याऊ नसेल आणि आपण जर त्याच्या प्रेमात पडलो, तर ती  आपल्या लहानपणीच्या प्रेमासोबत प्रतारणा ठरली असती. म्हणून भलेही तिला अभयबद्दल कितीही काही वाटू दे. ती आपल्या म्याऊवरच्या निस्सीम प्रेमावरच ठाम राहणार होती. जोपर्यंत तिला खात्री होत नाही कि, अभय आणि म्याऊ वेगवगळे आहेत. तोपर्यंत तिने अभयचा विचार करणं सोडून द्यायचं असं ठरवलं.  जर अभयच म्याऊ असेल तर तिच्यासारखी नशीबवान व्यक्ती कुणी असणार नव्हती. ती मनोमन बाप्पाला हीच प्रार्थना करत होती. कदाचित बाप्पाच्या मनात देखील हेच असावे. पण योग्य वेळ येण्याची प्रतीक्षा असावी. तसंही अभय तिला जास्त भेटला नव्हता. त्या दोन-चार भेटीनंतर मात्र तो अचानक कुठे गायब झाला होता. शेवटच्या भेटीनंतर जाताना तो परत तिला भेटेल कि नाही अशी तिच्या मनात भीती होती आणि तीच खरी ठरली होती. त्यांनतर अभय तिला भेटलाच नव्हता. हळूहळू अभय तिला विस्मरणात गेला. ती फक्त म्याऊचा विचार करायची. त्याला कसं शोधता येईल याच्या विचारात ती नेहमी असायची. 

            आज पाच वर्षं झाली होती. तिकडे अभय एक यशस्वी बिजनेसमॅन आणि इकडे ऋतिका एक चांगली डॉक्टर झाली होती. शहरातल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ती कार्यरत होती. तिच्या प्रेमळ आणि मनमिळाऊ वागण्यामुळे आणि हुशारीमुळे ती अल्पावधीतच नावारूपाला आली होती. आजच्या तारखेला तीची शहरातल्या चांगल्या डॉक्टरांमध्ये गणना होत होती. तिने आपल्या घराजवळ एक स्वतःचं  क्लीनिक सुरु केलं होतं. पण ते गरीब आणि गरजू लोकांसाठी. त्यांच्यावर ती मोफत उपचार करायची. आपल्या हॉस्पिटलमधल्या वेळा सांभाळून ती एक प्रकारे समाजसेवाच करत होती. आणि त्यासोबतच विविध अनाथ आश्रमांना वैद्यकीय सेवा पुरवत होती.  तिच्या अण्णांना तिचा खूप अभिमान होता. आपली ऋतिका म्हणजे सोनं आहे असंच वाटायचं त्यांना. 

            ऋतिका आपल्या क्लीनिक आणि हॉस्पिटल मध्ये खूप बिझी झाली होती. सकाळची संध्याकाळ कधी व्हायची हेच तिला कळायचं नाही. तिचं डेलीचं रुटीन पण अगदी ठरून गेलं होतं. पण ह्या सगळ्यात ती तिच्या म्याऊला विसरलेली नव्हती. ती अजुनपण त्याचीच वाट पाहत होती. ह्या सगळ्यातून उसंत मिळाली कि, ती म्याऊच्या आठवणीत रमून जात असे. कुठे खेळणारी लहान मुले दिसली कि तिला त्यांच्यात तेच लहानपनीचे चिऊ नि म्याऊ दिसायचे. तिने आपल्या केबिन मध्ये देखील त्यांचा एक लहानपणीच फोटो लावला होता. त्यामध्ये ती म्याऊला शोधत राहायची.

            ऋतिकाच्या हॉस्पिटलसमोर रस्त्याच्या पलीकडे एक  मोठ्या कंपनीचं ऑफिस होतं. कंपनी खूप मोठी असणार असं त्या ऑफिसकडे बघून वाटायचं. ती कुठली आणि कोणाची  कंपनी आहे, ह्याबद्दल ऋतिकाने कधी विचार नव्हता केला. पण काय माहित, पण अचानक तिच्या मनात विचार चमकून गेला आणि सोबत एक प्रकारची बेचैनी देखील आली.  हॉस्पिटलमधल्या आपल्या केबिनमध्ये बसून तिच्या मनात विचार तो डोकावला. ही नक्की कोणाची कंपनी असेल आणि तिचा  मालक कोण असेल. खूप मोठी कंपनी असेल हि आणि तिचा मालकही तेवढाच मोठा माणूस  असेल. पण जाऊदे आपल्याला काय करायचं. आपल्याला कुठे तिथे जॉबला जायचं आहे. असं म्हणून तो विचार झटकून टाकला आणि ती आपल्या व्हिजिटला निघाली. पण जाताना तिला उगाच त्या फोटोमधील म्याऊ हसल्यासारखा वाटला. तसा तो फोटो ते दोघे हसत असतानाच काढला होता. पण नेमका तो खरंच हसला कि ह्याचा तिला भास झाला असं समजून तिने त्याकडे दुर्लक्ष केले. 

           अभयला आज सकाळपासून वेगळेपण जाणवत होतं. आज नक्कीच  काहीतरी वेगळं घडणार असं त्याचं मन त्याला सांगत होतं. अभय आपल्या कंपनीच्या वेगवेगळ्या शहरातील असणाऱ्या ब्रांचला भेट द्यायला जाणार होता. तसं त्याने सुरुवात देखील केली होती. सगळीकडे भेट देऊन झाल्यावर शेवटची एक ब्रँच उरली होती. तिकडेच आज जायचं होतं. तेव्हाच अभयला असं जाणवू लागलं होतं. जाऊयात कि नको असं अभयला वाटत होतं. पण शेवटचीच एक ब्रँच उरलीय आणि परत ह्या सगळ्यांसाठी वेळ नाहीय म्हणून तो जायला निघाला. पण त्याचं हृदय मात्र जोरजोरात धडधड करत होतं. आज कितीतरी दिवसांनी तो हे धडधडणं अनुभवत होता. आणि त्याला अचानक ऋतिकाची आठवण झाली. हो अचानकच. कारण इतकी वर्षं तो तिला विसरलेलाच होता. किंबहुना कामाच्या गडबडीत आणि बिजनेसमध्ये सेटल व्हायच्या भानगडीत त्याला ऋतिकाचा विसर पडला होता. फक्त त्याच्या चिऊला सोडून. ती नेहमी त्याच्या लक्षात राहायची. दिवसभर कितीही बिझी असला तरी रात्री झोपताना तो चिऊची आठवण काढतच झोपायचा. पण आज इतक्या वर्षांनी ऋतिका कशी आठवली अचानक हेच त्याला समजेना. कारण जेव्हा ती त्याला भेटली होती तेव्हा तो तिला कधी विसरणारच नाही असं वाटत होत. पण तो देखील ऋतिकासारखंच आपल्या लहानपणीच्या प्रेमासमोर एकमेकांना विसरले होते. 

           याबद्दल त्याने निखिलशी बोलायचं ठरवलं. म्हणून तो गाडीत बसून  निखिल यायची वाट  बघू लागला. लगेच निखिलदेखील आला आणि ते निघाले. थोडं पुढे गेल्यावर अभयने निखिलला सांगायचं ठरवलं. 

"निखिल" अभयने पुढे बसलेल्या निखिलला आवाज दिला

"हा बोल अभ्या. काय झालं रे" त्याच्या आवाजवरून काहीतरी झालं असं वाटून निखिल म्हणाला. 

 "निखिल, यार आज खूप बेचैन वाटतंय" अभय म्हणाला. 

"का रे? काय झालं? तब्येत ठीक नाहीय का? निघताना तर व्यवस्थित होतास कि"

"नाही रे, बरा आहे मी फक्त थोडं अस्वस्थ वाटतंय, जसं ऋतिका पहिल्यांदा भेटल्यावर वाटत होतं तसंच वाटतंय." अभयने निखिलला मनातलं बोलून दाखवलं. 

"काय पण काय अभ्या, च्यायला तू तर तिला विसरून पण गेला होतास इतक्या वर्षांत. आणि आज अचानक तुला कशी आठवली ती. त्या दिवसांनंतर कधी साधा तिचा विचारपण केला नाहीस आणि आज म्हणतोय की, बेचैन वाटतंय म्हणून. तिची आठवण आली म्हणून " निखिल  म्हणाला. कारण इतक्या दिवसांनी ऋतिकाचं नाव ऐकून तो थोडा विचारांत पडला होता. 

"तसं नाही रे निख्या, माझ्यासाठी ऋतिकापेक्षा चिऊ जास्त महत्त्वाची आहे म्हणून मी तिचा विचार सोडून दिला होता. पण आज अचानक माहित नाही का पण जसं ऋतिका भेटायच्या वेळेस झालं होतं नेमकं तसंच होतंय." अभय मनातली बेचैनी निखलला सांगत होता. 

"म्हणजे तुला काय म्हणायचं आहे कि, आज तुला ऋतिका भेटणार आहे" निखिल चमकून म्हणाला. 

"माहित नाही. पण काय सांगू नाही शकत. मन खूप अस्वस्थ आहे." अभय म्हणाला. 

"बरं जाऊ दे. तू जास्त विचार नको करुस. बघू काय होईल ते. आज शेवटच्या  ब्रँचची  व्हिजिट आहे आपली. ती आटपून झाली कि बघू काय ते." असं म्हणून निखिल आपल्या सीटवर रेलून बसला. कारण ती ब्रँच तशी खूप दूर होती त्यांच्या घरापासून. अभयपण नाईलाजाने मागे टेकून बसत विचार करायला लागला.  

कॉलेजच्या दिवसातला फ्लॅशबॅक लगेच त्याच्या डोळ्यांसमोरून सर्रकन गेला. त्या विचारातच त्याला झोप लागली. निखिलपण विचार करत होता, कि ह्याचं पण काय कळत नाही. कधी चिऊच माझं प्रेम आहे म्हणतो तर कधी ऋतिकाच्या मागे वेडा होतो. इतक्या दिवसांनी आज त्याला ऋतिका आठवणे म्हणजे नवलच आहे. नक्की काय ते समजत नाही ह्याचं. ऋतिका कि चिऊ. किंवा दोघीही. बघुयात...