Search This Blog

Sunday, May 2, 2021

अनोळखी हे प्रेम - Part 10

   



"आज मौसम बड़ा बेईमान है

बड़ा बेईमान है, आज मौसम

आने वाला कोई तूफ़ान है

कोई तूफ़ान है, आज मौसम....." 

              निखिल खूप दिवस झाले टपरीवरचा चहा प्यायला नव्हता म्हणून हॉस्पिटलच्या जवळ असलेल्या टपरीवर चहा प्यायला आला होता. तेव्हा तिथे रेडिओवर हे गाणं लागलं. तेही खरंच होतं म्हणा. कारण आजचं वातावरण बघून तरी असंच वाटत होतं. ढगाळ वातावरण तयार झालं होतं. हवेत गारवा जाणवू लागला होता. सकाळीच असं ढगाळ वातावरण बघून काहीजण आज जोरदार पाऊस येणार असल्याचा अंदाज बांधत होते. तिथे टपरीवर त्यांच्या कंपनीतले काही एम्प्लॉईजपण होते. त्यांनी ओळखू नये म्हणून निखिल थोडं अंतर ठेवून उभा होता. असं वातावरण अभयला खूप आवडतं, साला आता इथे असता तर लगेच कधी पाऊस येईल आणि कधी मी भिजायला जाईल असं सारखं म्हणत बसला असता. निखिलला अभयचं पावसाचं वेड माहिती होतं. त्याच्या आठवणीने त्याच्या चेहऱ्यावर दुःखद छटा उमटली. तो अभयला खूप मिस करत होता. 

                काल जे झालं ते एका अर्थाने बरंच झालं होतं. निदान त्या दोघांमधल्या एकाला तरी कळलं होतं कि, आपलं लहानपणीचं प्रेम आपल्या जवळच आहे म्हणून. ऋतिका तर काल तिला कळाल्यापासन घरीच नव्हती गेलेली.  रात्रीपण तिथेच अभयजवळ सोफ्यावर झोपली होती. आणि आज सकाळी तशीच उठून आपल्या कामाला लागली होती. ऋतिकाला अभयजवळ तसंच थोड्यावेळासाठी सोडून निखिल जरा बाहेर आला होता. निखिलला ऋतिकासाठी मनापासून वाईट वाटत होतं. नशिबाने एखाद्यासोबत इतकंही वाईट वागू नये, असंच त्याला तिच्यासाठी वाटत होतं. कारण सरळ होतं. तिने ज्याची आजपर्यंत वाट बघितली ते तिचं लहानपणीचं प्रेम तिला अशा अवस्थेमध्ये परत भेटावं ह्यापेक्षा कमनशिबीपणा दुसरा काय असू शकतो. निखिलने विचार करता करता आपला चहा आणि सिगरेट संपवली. पाऊस चालू व्हायच्या आधी हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे, नाहीतर उगाच भिजायला होईल. कारण आपल्याला अभयसारखं पावसात भिजायला काही आवडत नाही. म्हणून नकोच ते भिजणं, असं म्हणत तो पळत हॉस्पिटलकडे निघाला. पण तेवढ्यात ढगांचा गडगडाट होऊन जोरदार पावसाला सुरवात झालीच.  आणि नाही म्हटलं तरी निखिल थोडा पावसात भिजलाच. तो तसाच चरफडत पावसाला शिव्या घालत आत आला. 

              ऋतिका तिच्या रुटीन चेकअपला गेली होती. म्हणून निखिल अभयजवळ जाऊन बसला. बाहेर मुसळधार  पावसाला  सुरुवात झाली होती. वारा आपला जोर दाखवत होता. विजा कडाडत होत्या आणि तेवढ्याच जोराने ढग गर्जत होते. जणू काही वादळच सुटलं होतं बाहेर. निखिलला मघाशी ऐकलेल्या गाण्याची आठवण झाली आणि मनातल्या मनात म्हणाला, च्यायला खरंच तुफान आलं की. 

                     निखिल लॅपटॉपवर काहीतरी काम करत होता. तेवढ्यात त्याला जाणवलं कि अभयच्या हाताची हालचाल होतेय. त्याचा हात थरथरतोय. म्हणून त्याने पटकन ऋतिकाला कॉल करून बोलावून घेतलं. तशी ऋतिका धावतपळतच आली. तिच्यासोबत आणखी एक तिचे सिनियर डॉक्टर होते. त्यांनी अभयला तपासलं. आणि एक हलकीशी स्माईल देत ऋतिकाकडे पाहत निखिलला म्हणाले,

"गुड न्यूज आहे. अभय शुद्धीवर यायचा प्रयत्न करतोय. कुठल्याही क्षणी त्याला जाग येईल."

 तसा ऋतिकाचा चेहरा उजळला. अभय शुद्धीवर येतोय हे पाहून तिला खूप आनंद झाला होता. निखिल तर उड्या मारायचाच बाकी होता. 

"ऋतिका तू इथेच थांब. तुझी गरज लागेल इथे.  मला एका व्हिजिटकरता जावं लागणार आहे. सो टेक केअर ऑफ हिम." असं म्हणून ते डॉक्टर निघून गेले. ऋतिकाने ताबडतोब एका नर्सला काही इंजेक्शन्स आणायला सांगितली. अभय खूप दिवसांनी शुद्धीवर येत असल्यामुळे त्याला शुद्धीवर आल्यावर त्याच्या जवळचं कोणीतरी समोर असायला हवं होतं. म्हणून ऋतिका निखिलला म्हणाली,

"निखिल, तुला अभयजवळ थांबावं लागेल. कारण डोळे उघडताना त्याला आपलं कोणीतरी समोर दिसलं कि तो पटकन शुद्धीवर येईल."

"हो ते ठीक आहे ऋतिका, पण त्याच्या जास्त जवळ तुम्ही आहात. म्हणजे त्याची चिऊ आहे. मग मी का?" निखिलने विचारले. 

"अरे निखिल, अभय मला चिऊ म्हणून नाही तर ऋतिका म्हणून ओळखतोय. त्याला अजून कुठे माहितीय कि मी चिऊ आहे म्हणून. आणि तसंही माझ्यापेक्षा जास्त वेळ तू त्याच्यासोबत राहिलाय. सो प्लिज." ऋतिका त्याला समजावत म्हणाली. 

"हम्म बरं." असं म्हणून अभय निखिलजवळ जाऊन उभा राहिला. 

              अभय शुद्धीवर येत होता हळू हळू. तेव्हा निखिल त्याच्याजवळ आणि ऋतिका त्याच्या दुसऱ्या बाजूला उभी होते. अभयच्या तोंडून अस्फुटसा आवाज येत होता. काय बोलतोय हे न समजून निखिलने आपले कां त्याच्या तोंडाजवळ नेले तसं त्याला थोडंफार ऐकू आलं. तो चिऊचं नाव घेत होता सारखं आणि मध्येच 'निख्या माझी चिऊ कुठाय, तिला घेऊन ये माझ्याजवळ' असं म्हणत होता. त्याच्या तोंडून आपलं म्हणजेच चिऊचं नाव ऐकून ऋतिका आनंदून गेली. तिच्या डोळ्यांतून हलकेच अश्रुंचे दोन थेंब ओघळले. निखिलच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य होते. 

                अभय हळूहळू पापण्यांची उघडझाप  करत डोळे किलकिले करून पाहत होता. कारण खूप दिवसांनी डोळे उघडत असल्यामुळे त्याचे डोळे तिथल्या उजेडाला सरावेपर्यंत त्याला डोळे उघडून पाहायला थोडा त्रास होणारच होता. ऋतिकाने पटकन काही औषधं इंजेक्शनमधून सलाईनमध्ये सोडली. अभय आता पूर्ण शुद्धीवर आला होता. त्याने डोळे उघडून बघितले. निखिल त्याच्या बाजूलाच बसला होता. ऋतिका समोर उभी होती. त्या दोघांकडे बघून त्याने हलकेच एक स्माईल दिली आणि उठून बसायचा प्रयत्न करू लागला. निखिल त्याला उठून बसायला मदत करू लागला. तसं ऋतिकाने अडवलं,

"अभय, लगेच उठू नकोस. तुला पटकन उठता नाही येणार. थोडा वेळ विश्रांती घे, तुझ्या शरीराला नॉर्मल अवस्थेमध्ये येऊ दे. मग उठून बस. ओके." ऋतिका प्रेमाने त्याला म्हणाली. मोठ्या मुश्किलीने तिने ओठांवर आलेलं म्याऊ हे नाव अडवलं होतं. 

"निखिल, अभयला थोडा वेळ आराम करू दे आता. आपण येऊ थोड्या वेळाने." असं म्हणून ऋतिका बाहेर जायला वळली. पण खरंतर तिला आपल्या डोळ्यांत आलेलं पाणी पुसायचं होतं. अभयच्या नजरेतून हो गोष्ट सुटली नाही, पण त्याला विश्रांतीची गरज असल्यामुळे त्याला थोडी भोवळ आल्यासारखी झाली आणि तो झोपेच्या अधीन झाला. निखिलदेखील त्याला आराम करायला देऊन ऋतिका पाठोपाठ बाहेर आला. 

            ऋतिका कॉरिडॉर मधल्या खिडकीजवळ येऊन उभी होती. खिडकीतून ती धो  धो  कोसळणाऱ्या पावसाला  पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद होता, एक समाधान होतं. पण डोळ्यांत एकप्रकारची काळजी होती. अस्वस्थता होती. मनात एक बेचैनी कायम होती. डोक्यात विचारांचं थैमान होतं. निखिल तिच्या बाजूला येऊन उभा राहिला. 

"ऋतिका" त्याने तिला आवाज दिला. 

"हंम्म" तिला माहिती होतं निखिल असणार ते, म्हणून तिने नुसता हुंकार भरला. नजर तशीच बाहेर कोसळणाऱ्या पावसावर होती. 

"आता कसं वाटतंय? म्हणजे अभय शुद्धीवर आलाय. तुमच्या समोर आहे तो. काही वेळा मध्ये त्यालाही तुमची खरी ओळख पटेल. तयार आहात ना तुम्ही?" निखिलने तिला विचारले. 

"माहित नाही. एवढे दिवस मी ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होती तो दिवस आज जवळ येऊन ठेपलाय.  पण मनाची तयारी नाही झालीय माझ्या अभयसमोर जायची. त्याला कशा रीतीने भेटू तेच कळत नाहीय. एका बाजूने त्याला भेटायची ओढ कायम आहे तर दुसऱ्या बाजूने त्याची काय प्रतिक्रिया असेल ह्याची भीती आहे. मी जसं त्याची वाट पहिली तशी त्यानेसुद्धा पहिली असेल का रे? जशी मी त्याच्या ओढीने त्याच्याकडे ओढली जात होते तसं त्यालादेखील वाटलं असेल का कधी? जशी माझ्या मनात हुरहूर दाटायची तशी त्यालाही वाटत असेल का रे? असे एक ना अनेक प्रश्न डोक्यांत थैमान घालतायत रे निखिल." ऋतिका आपल्या मनातली घालमेल निखिलला समजावण्याचा प्रयत्न करत होती. 

"ह्याचं उत्तर एकच आहे ऋतिका. होय" असं म्हणून निखिलने तिला अभयबद्दल सगळं सांगून टाकलं. कसं तो तिच्यासाठी वेडा झाला होता. तिच्याबद्दल त्यालाही तीच अनामिक ओढ कायम होती. तोदेखील तिच्या आठवणीने बेचैन व्हायचा. सारखं चिऊ चिऊ करायचा. आपल्या चिऊवरच्या प्रेमात ऋतिका येतेय म्हणून त्याने कसं तिला टाळलं होतं आणि आता त्याचा ऋतिकाला भेटल्यावर ऍक्सीडेन्ट कसा झाला इथपर्यंत सगळं काही. ऋतिका हे सगळं ऐकून अचंबित झाली. आणि एक प्रकारे समाधानदेखील वाटलं तिला. कारण आपल्यासारखाच आपला म्याऊ देखील आपल्यासाठी थांबला होता. खरंच ती ह्या क्षणाला स्वतःला खूप नशीबवान समजत होती. 

                 सगळं सांगून झाल्यावर निखिल ऋतिकाला म्हणाला,

"ऋतिका तुमच्या दोघांमध्ये तीच ओढ होती. तेच एक अदृश्य बंध होते ज्याने तुम्हाला आजतायगत जखडून ठेवले होते. तुम्ही दोघेही आपल्या लहानपणीच्या प्रेमाला विसरलेले नव्हता. उलट परत भेटून पण अनोळखी असताना पण तुमच्यात ती अनामिक भेटीची ओढ कायम होती. पण तुम्ही एकमेकांना ओळखत नसल्यामुळे आणि तुम्हाला माहित नसल्यामुळे तुम्हाला तुमच्या पहिल्या प्रेमाशी विश्वासघात करायचा नव्हता. म्हणून तुम्हाला एकमेकांबद्दल प्रेमाच्या उत्कट भावना  येऊन पण तुम्ही दोघेही आपल्या लहानपणीच्या प्रेमाशी इमानदार राहिलात. खरंच यार. ग्रेट आहात तुम्ही दोघे. नाहीतर आजकालच्या ह्या क्षणिक प्रेमाच्या दुनियेत तुमच्यासारखं एकमेकांपासून दूर राहून पण  एकमेकांशी अतूट राहिलेलं नातं खूप रेअर आहे. हॅट्स ऑफ टू यू" निखिल म्हणाला. 

"निखिल असं काही नाहीय रे. फक्त आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना त्याच्याशी लॉयल राहण्याची भावना असली ना कि आपण त्याची कितीही वाट पाहू शकतो. हीच तर ताकद असते खऱ्या प्रेमाची, जे आपल्याला दुसऱ्या कोणाचा होऊ नाही देत. मग तो आपल्या जवळ असूदेत किंवा लांब. त्याने काहीच फरक पडत नाही. प्रेम हि खूप सुंदर भावना आहे रे. तू देखील अनुभवलं असशील जर तु कोणावर खरं प्रेम केलं असेल तर." ऋतिका म्हणाली. 

"नाही ना ऋतिका, अजून कोणी तसं भेटलंच नाही खरं प्रेम होण्यासारखं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या गावच्या नाहीयेत. पण मला तुमच्यासारखे मित्र भेटले ना ह्यातच सगळं आलं. प्यार नही मिला  तो क्या हुआ,यार  तो ऐसे मिले है जो किसी प्यारसे कम नही." निखिल आपल्या नेहमीच्या स्टाईल ने म्हणाला आणि हसू लागला. त्याचं बोलणं ऐकून ऋतिकाला देखील हसू फुटलं. खरंच होतं ते. निखिलसारखा मित्र प्रत्येकाला मिळू दे असच ऋतिकाला वाटलं. 

         त्यांचं बोलणं चालू असतानाच एक नर्स त्यांच्याकडे आली आणि ऋतिकाला म्हणाली,

"डॉक्टर, अभय सरांना जाग आलीय. चला लवकर." 

          तिचा निरोप ऐकून ऋतिका आणि निखिल लगेच जायला निघाले. जाताना निखिलने ऋतिकाला अभयसमोर नॉर्मल राहायला सांगितले. मी सगळं प्लॅन करून करतो व्यवस्थित म्हणून त्याने तिला सध्या तरी काहीच बोलू नका म्हणून बजावले. कारण निखिलला त्याच्या मित्राला एक छान सरप्राईज द्यायचं होतं. 

            अभयला व्यवस्थित जग आली होती आणि तो त्यांचीच वाट बघत होता. त्या दोघांना एकत्र आलेलं पाहून त्याला ह्या दोघांची ओळख कधी झाली हेच कळेना. कारण त्याच्यामते तो काही वेळासाठी बेशुद्ध होता. पण त्याला आता खरं काय ते कळणार होतं. निखिलने अभयला उठून बसायला मदत केली. ऋतिका त्याची सलाईन चेक करत होती. तिने अभयला एकदा तपासले आणि बाजूला उभी राहिली. अभय उठून बसताच निखिलने त्याला मिठी मारली. अभयला समजेना निखिलने त्याला का मिठी मारली ते. म्हणून तो त्याला म्हणाला. 

"काय रे निख्या, काय झालं तुला. अचानक अशी मिठी का मारलीस? आणि डोळ्यांत पाणी का आहे तुझ्या?" अभयला काहीच समजत नव्हतं. 

"काही नाही रे अभ्या असंच. साल्या एवढ्या दिवसांनी तुझ्याशी बोललो ना म्हणून जरा इमोशनल झालो. बाकी काही नाही" निखिल म्हणाला. ऋतिका तिथेच त्यांचा भरतमिलाप बघत  डोळ्यांत येणारं  पाणी थांबवत उभी होती. 

"एवढ्या दिवसांनी म्हणजे? अरे आताच तर माझा ऍक्सीडेन्ट झालेला ना थोड्या वेळापूर्वी. थोडा वेळच तर मी बेशुद्ध होतो ना. मग" अभय गोंधळून म्हणाला. 

तसं निखिलने ऋतिकाकडे पाहिलं. ऋतिकाने त्याला नजरेनेच हे सगळं नॉर्मल आहे असं सांगितलं. तेव्हा तो परत अभयला म्हणाला,

"अभ्या, लेका थोड्या वेळा पूर्वी नाही रे दीड महिन्यापूर्वी तुझा ऍक्सीडेन्ट झालेला होता आणि तू फक्त थोडा वेळ नाही, तर चांगला दीड महिना कोमात होता." 

"काय बोलतोस निख्या? मी कोमामध्ये होतो, ते पण दीड महिना. बापरे! मग मला कसं कळलं नाही ते? "अभय आश्चर्यचकित होऊन म्हणाला. 

त्याचा तो प्रश्न ऐकून ऋतिका खुद्कन हसली. आपला म्याऊ अजुनपण तसाच निरागस आहे हे पाहून तिला बरं वाटलं. 

"अबे ये, कोमात असल्यावर तुला कसं कळेल तू कोमात आहेस ते? काय पण? कोमात जाऊन तुझ्या डोक्यावर तर परिणाम नाय ना झाला?" निखिल त्याला म्हणाला."डॉक्टर चेक करा जरा ह्याला." 

"हो पण मला काय माहिती ते? मी कुठे सारखा सारखा कोमात जातो ते माहित असायला." अभय म्हणाला. 

त्या दोघांचं बोलणं चालू होतं. ते पाहून ऋतिकाला हसायला येत होतं. ह्यांचं असंच बोलणं चालू राहिलं तर अभयला काहीच कळणार नाही आणि निखिलपण त्याला समजावून समजावून दमेल. म्हणून ऋतिकाच पुढे होऊन अभयला  म्हणाली,

"अभय, मी सांगते ऐक. तुझा दीड महिन्यांपूर्वी ऍक्सीडेन्ट झाला होता. तेव्हा तुझ्या डोक्याला खूप मार लागला होता आणि खूप रक्त वाहून गेलं होतं. त्याच्यामुळे तू कोमात गेला होतास. तेव्हापसून तुझ्यावर इथे आमच्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू होती. निखिलपण इथेच असायचा नेहमी. तुझ्या ट्रीटमेंटचा सगळा खर्च त्यानेच केलाय. तुला ह्या स्पेशल रूम मध्ये ठेवण्यापासून ते बाकी सगळ्या गोष्टी त्यानेच केल्यात. खूप काळजी घेतली त्याने तुझी. तू शुद्धीवर यावास म्हणून तो खूप प्रयत्न करत होता." 

             अभय हे सगळं ऐकत होता. निखिलने आपल्यासाठी हे सगळं केलेलं पाहून त्याला आतून खूप बरं वाटलं होतं. ऋतिका इथे डॉक्टर आहे हेही त्याला नव्यानेच कळत होतं. पण त्याला ऋतिकाचं निखिलच्या बाजूने बोलणं जरा अजबच वाटलं. कारण तिला अभयबद्दल खरी माहिती नव्हती. आणि तिचा असच समज होता कि, अभय एक सर्वसामान्य मुलगा आहे आणि निखिल त्याचा श्रीमंत मित्र आहे. आणि आपल्या मैत्रीपायी निखिल हे सगळं करतोय. निखिलने अभयबद्दल खूप गुप्तता बाळगली असल्याने ऋतिकाचा असा समज झाला होता. 

             ऋतिकाचं बोलणं ऐकून अभयने चमकून निखिलकडे बघितलं. त्याने एक डोळा मिचकावत आपले खांदे उडवले. तुझ्याकडे नंतर बघतो मी, आता बाहेर जा तू. असं त्याला नजरेनेच सांगून अभय ऋतिकाला म्हणाला,

"ऋतिका खूप धन्यवाद तुझे. तू हे सगळं माझ्यासाठी केलंस ते. तेही आपली जास्त ओळख नसताना."

"ओळख नाही असं कसं म्हणतोस तू अभय. तुला आठवत नाहीय का आपण ह्याआधीदेखील भेटलोय ते." ऋतिका त्याचं ते अनोळखीपणाचं बोलणं ऐकून कळवळून म्हणाली. 

"हो आठवतंय गं. पण आपली जास्त भेट झालीच कुठे?" अभयचं हृदय ऋतिकाशी बोलताना परत एकदा धडधडू लागलं होतं. 

"हो पण त्या एवढ्याश्या भेटीत पण आपली ओळख झालीच होती ना? हे तू विसरलास का?" ऋतिका स्वतःला कसंतरी थांबवत होती. तिला त्याला आताच सांगावंसं वाटत होतं कि, तूच माझा म्याऊ आहेस अन् मी तुझी चिऊ. त्यासाठी ती धडपडत होती.  

"नाही गं. विसरलेलो नाहीय मी काही. पण काहीतरी होतं जे मला अडवत होतं, म्हणून. . ." अभय बोलता बोलता  मध्येच थांबला. त्याला एवढ्याश्या बोलण्याने पण दम लागला होता. त्याला त्रास झालेला पाहून ऋतिकाने तो विषय तिथेच थांबवला. 

"बरं असू दे अभय. आपण नंतर बोलूयात ह्यावर. आराम कर आता तू." असं म्हणून ऋतिका त्याला आराम करायला सांगून निघून गेली. 

              बाहेर उभा असलेला निखिल ऋतिका  गेल्याचे पाहून लगेच आत आला. त्यांचं बोलणं चालू असताना तो बाहेर निघून गेला होता मघाशी. अभय डोळे बंद करून विचार करत होता. त्याला झोपलेलं पाहून तो खिडकीजवळ जाऊन उभा राहिला. निखिल आल्याची चाहूल लागली म्हणून अभयने डोळे उघडले आणि त्याला आवाज दिला. अभयचा आवाज ऐकून निखिल त्याच्याजवळ आला. 

"अरे तू तर झोपलेलास ना? कशाला उठलास मग? आराम करायचा ना." निखिल म्हणाला. 

"झोप नव्हती लागत यार. ऋतिकापण आताच गेली बाहेर. तिच्याशीच बोलत होतो." अभय म्हणाला. 

"काय बोलली मग तुझी ऋतिका?" निखिल मस्करी करत म्हणाला. 

"माझी ऋतिका? हो का?" अभय एक डोळा वर करत म्हणाला. 

"हो मग, साल्या तुझीच आहे ना. एवढं सगळं करतेय ती बिचारी तुझ्यासाठी. तुझा ऍक्सीडेन्ट झाल्यापासून ते आजपर्यंत तिने काय नाय केलं तुझ्यासाठी. तू कोमात असताना तर सारखं तुझ्याजवळच असायची ती. जास्त कधी घरी देखील जात नव्हती. तू शुद्धीवर आलाय तेव्हा कुठे तिच्या जीवात  जीव आलाय.  नशीब ती डॉक्टर आहे ते,तिने सगळं स्वतः लक्ष देऊन तुझी ट्रीटमेंट केलीय. नशीब काढलंस लेका. एवढी चांगली मुलगी तुझ्यावर जीव ओवाळून टाकतेय. खरंच यार, ऋतिका तुझ्यावर खूप प्रेम करते. कसं ते माहिती नाही, पण तिचा जीव आहेस लेका तू. एवढं तरी मला कळलंय ह्या दिवसांत." निखिल म्हणाला. 

अभय त्याचं ऐकत होता. ऋतिका आपल्यासाठी एवढं सगळं का करतेय, हेच त्याला कळत नव्हतं. मान्य आहे कि,तिलासुद्धा आपल्याबद्दल ओढ असेल पण हे प्रेम वगैरे त्याला सगळं नवीन होतं. निखिल सांगतोय म्हटल्यावर हे खरंच असणार आहे. पण अभयला चिऊ वरचं प्रेम ऋतिकाबद्दल विचार करण्यापासून थांबवत होतं. 

"हा यार ते आहेच, पण निख्या चिऊ असताना मी तिचा विचार नाही करू शकत. भलेही ऋतिका बद्दल मलासुद्धा एक ओढ आहे पण माझं पाहिलं प्रेम चिऊच आहे. मी फक्त तिचाच आहे. तिला मी फसवू नाही शकत निख्या." अभय म्हणाला. 

"हो अभ्या माहितीय मला, पण चिऊ कधी भेटणार तुला. तू साधं तिला शोधण्याचा प्रयत्न पण नाही केलास ह्या दिवसांत. फक्त चिऊची आठवण काढून ती तुझ्या जवळ येणार आहे का?" निखिल त्याला डिवचत म्हणाला. 

"अरे निख्या मीआपल्या कंपनीच्या कामात बिझी होतो. माहितीय ना तुला. मग. आणि आता तिला मी कसंही करून शोधणारच आहे. नाही राहू शकत मी आता तिच्याशिवाय" अभय म्हणाला. 

"हो अभ्या. पण एक सांगू,  तिला आता तुला शोधायची गरज नाहीय. फक्त मनापासून तिला हाक मार. ती इथेच आहे जवळपास तुझ्या. तुझी हाक ऐकून ती नक्कीच येईल तुझ्याकडे. असं माझं मन सांगतंय." निखिल अभयला थोडाफार अंदाज देत होता. म्हणून त्याने त्याला कोड्यात सांगितले. डायरेक्ट सांगितलं असतं तर काही मजाच राहिली नसती त्याच्या सरप्राईजची. 

"तुला कसं माहिती निख्या?" अभयने प्रश्न केला. 

"असंच रे. मला आतून असं वाटतंय. का? मन काय फक्त तुलाच एकट्याला आहे का? तुलाच घडणाऱ्या गोष्टींचा अंदाज येऊ शकतो का फक्त साल्या?  अपना भी सिक्स्थ सेन्स काम करता है भिडू " निखिल म्हणाला. 

"अच्छा हो का? क्या बात है. तुझा सिक्स्थ सेन्स कधीपासून काम करायला लागला रे निख्या" असं म्हणून अभय हसायला लागला. त्याला  निखिलपण हसायला लागला. 

"बरं निख्या मला एक सांग, ऋतिका मघाशी असं का म्हणत होती तुझ्याबद्दल कि, तू माझी सगळी ट्रीटमेंट केलीय. सगळं खर्च तू केलायस माझा आणि बाकी सगळं. तू काय सांगितलंय तिला नेमकं माझ्याबद्दल. मी कोण आहे हे सांगितलेलं तर दिसत नाहीय तू. मग दुसरं काय सांगितलंस तिला?" अभयने मघाशी त्याच्या मनात आलेला प्रश्न विचारला. 

तसा निखिल अजूनच हसायला लागला. 

"हसतोय काय निख्या? सांग कि मुर्खा, तिला काय भलतंसलतं नाय ना सांगितलंस माझ्याबद्दल काही?" अभय म्हणाला. 

"नाही रे अभ्या. मी तिला काहीच नाही सांगितलंय. उलट तू कोण आहेस हे मी सगळ्यांपासून लपवून ठेवलंय. एवढं कि हॉस्पिटलच्या समोर असलेल्या आपल्या ब्रँच ऑफिसमध्ये पण अजून महित नाहीय कि, तुझा ऍक्सीडेन्ट झालेला ते. आजीला पण नाही सांगितलंय अजून. फक्त बॉबी अंकलना सांगितलंय आणि त्यांना अभय आणि मी कंपनीच्या कामानिमित्त अचानक बाहेरगावी जायला लागलं असं सांगायला सांगितलं. आपल्या काही ठराविक गार्ड्सनाच फक्त माहितीय हे. नको काळजी करुस. मी सगळी सेक्युरिटी घेतलीय. आणि ऋतिकाचं म्हणशील तर तिला तू नक्की कोण आहेस ते माहिती नाहीय. तिला असंच वाटतंय कि, तू एक सामान्य माणूस आहे जो तिला ह्या आधी काही वर्षांपूर्वी भेटला होता. आणि ती मला ओळखत नव्हती म्हणून तिला असं वाटतंय कि, मी एक फार मोठा श्रीमंत माणूस आहे आणि तू माझा एक गरीब मित्र आहेस. तुझा ऍक्सीडेन्ट झाला तेव्हा मी तिथे नशिबाने होतो आणि नंतर मैत्रीखातर मीच तुझी या हॉस्पिटलमध्ये  चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट करतोय. म्हणून तुला मघाशी ती तसं म्हणाली."

निखिलचं बोलणं ऐकून अभयला हसूच आलं.

"अच्छा असं आहे तर. मी ह्या एका श्रीमंताचा गरीब मित्र आहे तर. गुड." अभय निखिलला टोमणा मारत म्हणाला. 

"अरे मी थोडी सांगितलं तिला. तिनेच स्वतःच तो समज करून घेतला. मग मी तरी कशाला काय बोलू. नंतर तू आणि ती बघून घेशील म्हणून मी जसं आहे तसं ठीकच म्हटलं." अभयचा टोमणा निखिलला लागला होता. 

"निख्या अरे मस्करी करतोय. मस्त काम केलंस लेका. बरं झालं तू तिला कळू नाही दिलंस ते आणि बाकीच्यांना पण." अभय निखिलचं कौतुक करत म्हणाला. 

"हा फिर ठीक है, तेरे लिये इतना तो कर हि सकता हू  मेरे यार." असं म्हणून निखिलने अभयच्या हात थोपटला. 

"हा मेरे भाई." असं म्हणून अभय निखिलला मिठी मारायला गेला. पण ते त्याला जमलंच नाही. कारण त्याला अजून स्वतःहून उठून बसता येत नव्हतं. म्हणून मग निखिलनेच त्याला हसून मिठी मारली. 

               ऋतिका अभयशी कसं बोलायचं त्याचा विचार करत होती.  ह्यामध्ये निखिल तिची मदत करणार होता. पण तरीसुद्धा आपल्यालाच त्याला सामोरं जायचं होतं. आपल्याला आपल्याच प्रेमाला  भेटायला भीती का वाटावी, ह्याचंच तिला आश्चर्य वाटलं.  तेही खरंच होतं म्हणा. तिला तशी भीती वाटणं स्वाभाविकच होतं. कारण अभयला ती अगोदर भेटली होती आणि त्याच्याबद्दल नाही म्हटलं तरी तिच्या मनात प्रेमभावना आल्या होत्या. आणि आता तिला तोच अभय तिचा म्याऊ आहे कळल्यावर त्याच्या समोर जायची भीती वाटत होती. कारण अप्रत्यक्षपणे आपण त्याला फसवल्याची भावना तिच्या मनात घर करत होती. तो काय विचार करेल  आपल्याबद्दल? आपण त्याला फसवलं असं तर त्याला वाटणार नाही ना? ह्याची एक अनामिक भीती तिला वाटत होती. त्याला भेटायच्या ओढीची जागा आता भीतीने घेतली होती.

                 अभयला ह्या बद्दल काही कल्पनाच नव्हती. तो फक्त ऋतिका आणि चिऊचाच विचार करत होता. चिऊला कसं शोधता येईल हेच तो बघत होता. आणि त्याबरोबरच ऋतिकाबद्दलच्या त्याच्या भावनांना तो समजून घ्यायचा प्रयत्न करत होता. 

                आणि इकडे निखिल ऋतिका आणि अभयला, अर्थातच चिऊ आणि म्याऊला कसं  भेटवता येईल ह्याचं प्लॅनिंग करत होता. त्याला त्यांची लवकरात लवकर भेट घडवून आणायची होती. तो त्याच विचारात होता. कारण लहानपणी एकमेकांपासून वेगळे झालेले दोन प्रेमी जीव आता भेटणार होते. त्यांची ती भेट अविस्मरणीय व्हावी अशी  निखिलची मनापासूनची प्रामाणिक इच्छा होती. आपल्या जिवलग मित्राला त्याचं प्रेम इतक्या वर्षांनी परत भेटणार म्हटल्यावर त्याला खूप आनंद झाला होता. फक्त त्यांचा तो  पुनर्मीलन सोहळा लवकरच पार पडावा ह्याचा तो विचार  करत होता.

Saturday, May 1, 2021

अनोळखी हे प्रेम - Part 9

 



            आज जवळपास दीड महिना उलटून गेला होता. अभय अजून शुद्धीवर आला नव्हता. निखिल आणि ऋतिका नेहमी अभयजवळच असत. निखिल कंपनीची सगळी जबाबदारी घेऊन काम करत होता. अभयसारखं जमत नव्हतं, पण बॉबी अंकलच्या मदतीने तो करत होता. त्याने कसबसं सगळं व्यवस्थित हाताळलं होतं. कंपनीची जबाबदारी, अभयची काळजी घेणं हे तो सख्या भावापेक्षा जास्त करत होता. ते खरंच  म्हणतात, देव ज्यांना आपल्या रक्ताच्या नात्यात बांधायला विसरतो त्यांना मित्र म्हणून पाठवतो. निखिल अभयला मित्रापेक्षा जास्त जपत होता. कारण अभयने त्याला काळजाशी लावलं होतं आणि तोही अभयला आपल्या जिगरका टूकडाच मानत होता. बस, आता अभय लवकरात लवकर शुद्धीवर यावी म्हणून तो देवाला विनवत होता.  

               ऋतिकाने तर अभयच्या काळजीमध्ये सगळ्या गोष्टी करून पहिल्या होत्या. गणपती बाप्पाला विनवण्यापासून ते उपासतापास सगळं केलं होतं. आपण हे सगळं का करतोय हेच तिला कळत नव्हतं. तिच्याही नकळत ती ह्या सगळ्या गोष्टी करत होती. ह्याचंच तिला जास्त आश्चर्य होतं. आपल्या केबिनमध्ये असली कि, म्याऊच्या फोटोकडे बघत त्याच्या आठवणींमध्ये गुंतलेली असायची आणि अभयकडे असली कि त्याच्या काळजीत असायची. तिच्या मनाची नुसती घालमेल चालू होती. मन सारखं अभयकडे ओढ घ्यायचं, पण म्याऊ आठवला कि लगेच माघारपण घ्यायचं. विश्वासघाताची भावना लगेच तिच्या मनात घर करायची. तिला हेच कळायचं नाही, कि आपण अभयसाठी एवढं सगळं का करतोय? उत्तरादाखल तिला एवढंच मिळायचं कि आपल्याला त्याच्याबद्दल एक अनामिक ओढ आहे. एक अनोळखी नातं आहे आपल्यात. जे तिच्याकडून हे सगळं करवून घेतंय. 

                   नेहमीप्रमाणे आजपण सकाळी सकाळी ऋतिका मंदिरात गेली होती. बाप्पांचा आशीर्वाद घेऊन प्रसाद घेण्यासाठी ती महाराजांकडे वळली, तसं तिला जाणवलं कि ते  तिच्याकडेच  एक गूढ हास्य घेऊन  बघत आहेत. ते महाराज तिच्या चांगलेच ओळखीचे होते. ती मंदिरात रोज येत असल्यामुळे महाराज तिला ओळखत होते. बाप्पांचं दर्शन घेऊन त्यांच्याकडून प्रसाद घेऊनच ती जात असे. त्यामुळे त्यांना तसं हसताना पाहून ऋतिका त्यांना विचारणार इतक्याच तेच तिला म्हणाले, 
"खूप विचार आहेत ना डोक्यात. आपण काय करतोय? कशासाठी करतोय? हे कळत नसताना सुद्धा सगळं तू निःस्वार्थपणे करतेयस. त्याचंच फळ तुला लवकर मिळणार आहे पोरी. जवळ आहेस खूप तू. इतकी कि फक्त एक पातळ पडदा आहे मध्ये. तो हटला कि तुला तुझं इच्छित फळ मिळेल."

त्यांच्या बोलण्याचा अर्थ न समजून ऋतिका म्हणाली,
"काय बाबा, काय मिळणार आहे? कसलं फळ? कशाच्या जवळ आहे मी " 

"इतके दिवस ज्याची तू वाट पाहिलीस तो अगदी जवळ आलाय तुझ्या. इतका जवळ कि तुझ्या डोळ्यांसमोर आहे तो. फक्त ओळख पोरी. त्याला ओळखलंस कि, सगळं कोडं सुटून जाईल तुझ्या मनातलं." असं बोलून बाबा तिला प्रसाद देऊन आणि आशीर्वाद देऊन मंदिराच्या गाभाऱ्यात निघून गेले. 

             आपल्याबद्दल ह्यांना कसं कळलं? आणि इतके दिवस ते काहीच कसे नाही बोलले आपल्याला? ह्याचं तिला आश्चर्य वाटलं. त्यांच्या बोलण्याच्या विचार करण्याच्या नादात ते कधी निघून गेले तिला समजलंच नाही. त्यांना विचारावं म्हणून ती त्यांना शोधू लागली. पण तिला ते दिसलेच नाहीत. म्हणून मग ती नाईलाजाने शेवटी ती परत एकदा गणपती बाप्पांच्या पाय पडून निघाली. 

               मंदिरातल्या महाराजांच्या बोलण्याचा ती हॉस्पिटलला पोहचेपर्यंत विचार करत होती. त्यांना नक्की काय सुचवायचे आहे हे तिला कळेचना. आपण जवळ आहोत खूप. भेटणार आहे आपल्याला तो. समोरच आहे तो आपल्या. पण कुठे. जर ते महाराज म्याऊ बद्दल बोलत असतील तर कुठे आहे तो. आणि आपल्याला कसं ओळखता नाही आलं मग? तिला एक वेळ असंही वाटलं, कि ते अभयबद्दल तर बोलत नसावेत. पण हे शक्य नाही. कारण तिला त्याबद्दल खात्री वाटत नव्हती. ह्याबद्दल तिने याआधीही विचार केला होता. त्यामुळे तिला माहिती होतं कि तो अभय नाहीय ते. पण मग जर अभय नसेल तर आणखी कोण आपल्या जवळ आहे ज्याची आपल्याला हल्ली नवीनच ओळख झालीय. विचार करता करता तिला आठवलं, निखिल ! कदाचित  तो निखिल तर नसेल. हो निखिल. कारण त्याच्याशी आपली इतक्या कमी वेळात खूप चांगली ओळख झालीय. आपण आजवर कुणाशी इतक्या चांगल्या प्रकारे मिसळलो नव्हतो. निखिलसोबतआपली खूपच चांगली मैत्री जुळलीय. पण मग जर निखिल म्याऊ असता तर आपल्याला अभयबद्दल ती अनामिक ओढ का वाटतेय? आपण त्याच्यात का एवढं गुंततोय? त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये एवढी ओढ का आहे? नाही तो निखिल नसेल. जर तो अभय नाहीय असं आपल्याला वाटतं आणि तो निखिलसुद्धा नाहीय मग आपला म्याऊ नक्की आहे तरी कोण? 

                 विचार करून करून ऋतिकाचं डोकं बधिर झालं होतं. ह्या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावायचाच असं ठरवून तिने आजच्या दिवसाला सुरुवात केली. अभयशी तर काही बोलता येणार नाही, कारण तो शुद्धीवर नाहीय आणि निखिलशी बोलायचं तर आजच बोलून घेऊ असं तिने ठरवलं.  त्यासाठी तिला वेगळा वेळ काढावा लागणार होता. म्हणून तिने तिच्या हॉस्पिटलमधल्या सगळ्या अपॉईंटमेंट्स पटापट उरकून घेतल्या आणि मोकळी झाली. तिच्या नशिबाने तिला आज फार काही अपॉईंटमेंट्स नव्हत्या आणि फक्त रुटीन चेकअप. ते तिने पटकन यावरून घेतलं. आपण एवढ्या पटापट काम करू शकतो ह्याचं तिला आश्चर्यच वाटलं. कारण याआधी तिने अशी घाई कधीच केली नव्हती. प्रत्येक पेशण्टशी व्यवस्थित बोलून सावकाश त्यांच्यावर ट्रीटमेंट करत होती. 

            तिने घडाळ्यात पहिले तर चार वाजले होते. म्हणजे अजून तिला तिच्या क्लिनिकला जायला भरपूर वेळ होता. चांगले तीन तास तिच्या हातात होते. त्याचा उपयोग करून ती निखिलशी सगळं बोलणार होती. फक्त मनोमन एकच प्रार्थना करत होती, कि मध्येच काही इमरजेंसी  नको यायला. नाहीतर परत असा  वेळ तिला लवकर भेटणार नव्हता. 

           ऋतिका अभयच्या रूम मध्ये आली तेव्हा तिथे निखिल नव्हता. बहुतेक त्याच्या कामासाठी बाहेर गेला असेल. आज तिच्याकडे मोकळा वेळ असल्यामुळे ती एक एक गोष्ट न्याहाळू लागली. अभय गाढ झोपेत असल्यासारखा पडून होता. गेला दीड महिना तो अशाच गाढ झोपेत होता. ती त्याच्या बेड जवळ असलेल्या सोफ्यावर बसली. अभयकडे पाहून तिला कसनुसंच झालं. प्रत्येक वेळेला हा आपल्याला भेटतो आणि लगेच दूर निघून जातो. ह्यावेळेस भेटला आणि जवळ असूनपण  असा दूरच राहिला.  आणि आपला म्याऊ तर अजून भेटलेलाच नाहीय आपल्याला. ती विचार करत करत रूम मध्ये नजर फिरवत होती. इतके दिवस आपण असं निवांत बसलोच नव्हतो अभयजवळ. अभय असलेली रूम चांगली ऐसपैस होती. प्रत्येक आधुनिक उपचारपद्धतीची साधनं तिथे  होती. प्रत्येक वेळेला लागणारी औषधं आणि इंजेक्शनं आधीपासूनच आणून ठेवली होती. एका कोपऱ्यात वरती मस्त रूमफ्रेशनर लावलेला होता. त्याचा मंद सुगंध दरवळत होता. त्यामुळे तिला क्षणभर आपण हॉस्पिटलमध्ये नाहीच आहोत असा भास झाला. कारण बाहेरच्या वातावरणात आणि त्या रूमच्या वातावरणात खूप फरक होता. त्याच्या रूमला मोठ्या मोठ्या हवेशीर खिडक्या होत्या, पण त्याची एसी रूम असल्यामुळे त्या बंद होत्या. तिने त्यावरील पडदे बाजूला सारले तशी  संध्याकाळची  सूर्याची कोवळी किरणं आत शिरली. आपल्या हॉस्पिटलने अभय साठी  एवढी प्रशस्त आणि आधुनिक रूम का दिली हेच तिला कळलं नाही. आपल्या हॉस्पिटलध्ये अशा रूम्स फक्त श्रीमंत, खूप श्रीमंत लोकांसाठी दिल्या जातात हे तिला माहिती होतं आणि अभय तिला वाटत नव्हतं कि तो इतका श्रीमंत असावा. त्याच्या रूमच्या बाहेर नेहमी असणाऱ्या दोन गार्ड्सना बघून तिला थोडं खटकलंच होतं. पण तिने चाललेल्या गोंधळामुळे एवढं लक्ष दिलं नव्हतं. कदाचित निखिलने केलं असेल त्याच्यासाठी. तसंपण निखिल आहेच म्हणा श्रीमंत, त्याने केलं असेल आपल्या मित्रासाठी. असाही विचार तिच्या मनात डोकावला. पण असो. प्रश्न तो नाहीय. आपल्याला अभयशी घेणंदेणं आहे,  त्याच्या कोण असण्याशी नाही. असं म्हणून मनात येऊ पाहणारा गरीब श्रीमंत भेदभावाचा विचार तिने तात्काळ झटकून टाकला.  
             
              ऋतिका अभयच्या रूम मध्ये पाहून निखिलला आश्चर्य वाटलं नाही. पण ती अशी निवांत बसलेली पाहून गोंधळला.  कारण अभयच्या रूमचा ऍक्सेस फक्त निखिल आणि ऋतिका जवळ आणि हॉस्पिटलमधल्या काही ठराविक लोकांजवळच होता. त्यानेच तशी सुरक्षितता करवून घेतली होती. निखिल आलेला पाहून ऋतिका त्याच्याजवळ आली. तिला तसं पाहून निखिलला वाटलं कि खास त्याच्याशी बोलायलाच आली आहे. तसं असेल तर निखिलला देखील बरंच होतं. कारण तो हि त्याचीच वाट बघत होता. शेवटी त्यालाही काही गोष्टी अभयच्या वतीने स्पष्ट करायच्या होत्या. 

"हाय निखिल." ऋतिका म्हणाली. 

"बोला, डॉक्टरसाहेब. आज निवांत दिसताय." निखिल शक्य तितका मोकळेपणा ठेवायच्या प्रयत्नाने म्हणाला. 

"हो. ते आज काही खास काम नव्हतं आणि माझी कामंदेखील झाली होती सगळी. फ्री होते म्हणून म्हटलं इथे यावं जरा वेळ." ऋतिका म्हणाली. 

"अच्छा म्हणजे डॉक्टरांना पण फ्री वेळ भेटतो तर" असं म्हणून निखिल डोळे मिचकावत हसला. 

"हो म्हणजे भेटतो कधी तरी. शेवटी नाही म्हटलं तरी आम्ही पण माणसंच आहोत ना आणि आम्हालाही वाटतं थोडा वेळ आम्हालाही मोकळा भेटावा. नाही का ? " ऋतिका पण निखिलच्या हसण्यात सामील होत म्हणाली. 

"म्हणजे काय डॉक्टर. जरूर जरूर. उलट मी तर म्हणतो कि डॉक्टरांसाठीपण आमच्या सारखे काही ठराविक तास असायला हवेत. किती प्रेशर असतं तुमच्या लोकांना. हा झाला कि तो पेशंट तो झाला कि परत दुसरा. सारखी लाईनच असते पेशंट्सची." 

"तसं असून कसं चालेल निखिल. जर आम्हाला असे ठराविक काम करायची सवय लागली तर एखाद्या इमरजेंसीच्या वेळेस कोणी उपलब्ध नाही होणार. कारण कधी काही इमरजेंसी येईल ते सांगू नाही शकत. म्हणून आम्हाला दिवसातल्या कुठल्याही वेळेला पेशंट सांभाळण्यासाठी तयार असावं लागतं. नाहीतर मग लोकांचा डॉक्टरांवरील विश्वास उडून ते अंधश्रद्धेकडे वळायला वेळ नाही लागणार."  ऋतिका म्हणाली. 

"हो डॉक्टर, ते पण आहेच. म्हणून तर तुम्हा डॉक्टर लोकांना समाजात एक वेगळाच मान आहे. सॅल्यूट टू यू" असं म्हणून निखिलने ऋतिकाला सॅल्यूट ठोकला.

"काहीतरीच काय निखिल. कर हात खाली तो आधी " असं म्हणून ऋतिका हसायला लागली. कारण निखिल सेम शाळेतल्या मुलासारखा वेडावाकडा हात डोक्याला लावून सॅल्यूट ठोकून उभा होता. ते पाहून ऋतिकाला हसायला येत होतं. निखिल पण हसू लागला. 

हसता हसता तो ऋतिकाला म्हणाला,
"डॉक्टर, अजून किती दिवस लागतील माझ्या मित्राला ह्यातून बाहेर पडायला." निखिलचं लक्ष अभयकडे होतं. त्याला असं मध्येच इमोशनल झालेलं पाहून ऋतिका म्हणाली,
"आपल्या हातामध्ये नाहीय ते निखिल. ते सगळं बाप्पाच्या हातात आहे. आम्ही जेवढं होईल तेवढं सगळं ट्राय करतच आहोत. जेवढी बेस्ट ट्रीटमेंट देता येईल तेवढी आम्ही देतोय. बाकी सगळं त्याच्या हातात आहे."

"हम्म" असं म्हणून निखिल अभजवळ जाऊन बसला. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाला,"अभ्या यार उठ लवकर. अजून किती दिवस असा झोपून काढणारेस साल्या. उठ यार. तुझ्याशिवाय मन नाही लागत. तूच म्हणतो ना, तुझ्याशिवाय कोणी मित्र नाही माझा. पण हे तुला कसं नाही माहित कि, मलापण तुझ्याशिवाय कुठला मित्र नाहीय. तू अकेलाही मेरी जान है यार. उठ जा यार." असं म्हणून त्याच्या डोळ्यांतून येणारं पाणी पुसायला तो ऋतिकाकडे पाठ करून खिकडीजवळ जाऊन उभा राहिला. 

त्याला तसं इमोशनल झालेला पाहून ऋतिकाला खूप वाईट वाटलं. पण ती तरी काय करू शकत होती. निखिलला सावरण्यासाठी ती त्याला म्हणाली,
"निखिल, सावर स्वतःला. येईल अभय लवकरच शुद्धीवर. मलादेखील त्याची खूप काळजी वाटतेय. तो लवकरात लवकर शुद्धीवर यावा यासाठी मी पण खूप प्रयत्न करतेय.  पण मीसुद्धा हतबल आहे रे." असं म्हणून ती सुद्धा भावनेच्या भरात काही बोलू न शकल्यामुळे शांत झाली. 

"हो. माहितीय मला डॉक्टर. पाहत आलोय मी सगळं. ऍक्सीडेन्ट झाल्या क्षणापासून तुम्ही अभय साठी खूप काही केलंय. त्यासाठी खरंच मी खूप आभारी आहे तुमचा. पण डॉक्टर एक विचारू तुम्हाला?" निखिलने हीच योग्य वेळ असं समजून ऋतिकाला विचारले. 

"हो विचार ना निखिल? परवानगी काय घेतोयस?" ऋतिका स्वतःला नॉर्मल करत म्हणाली. 

"नाही म्हणजे थोडं पर्सनल आहे म्हणून" निखिल सावधगिरीने म्हणाला. 

"अरे आता आपण चांगले मित्र आहोत. सो डोन्ट वरी. विचार बिनधास्त" ऋतिका म्हणाली. 

"तुम्ही अभयला ओळखता का? म्हणजे कधीपासून ओळखता त्याला?" निखिलने पहिला प्रश्न केला. 

"हो ओळखते मी त्याला. म्हणजे असं पक्कं नाही सांगता येणार. पण काही वर्षांपूर्वी असाच अभय एकदा आमच्या घराजवळ ऍक्सीडेन्ट झालेला म्हणून भेटला होता. त्याच्यासोबत आणखी एकजण होता. तेव्हा मी  एम.बी.बी. एस. करत होते." ऋतिका म्हणाली. 

"अच्छा, म्हणजे फक्त एकदाच भेटलेलात तुम्ही?" निखिलने परत प्रश्न केला. 
 
"नाही. त्यांनतर परत एकदा आलेला तो. बहुतेक कुठंतरी बाहेर चाललेला तो. कदाचित त्यासाठीच तो मला भेटायला आला असेल. करणं त्यांनतर तो परत कधीच दिसला नाही आणि  भेटला ते आताच आणि तेही असं झालं" ऋतिका आठवत म्हणाली. 

"हम्म बरं. पण एवढीच ओळख आहे तुमची तर. मग तुम्ही एवढ्या काळजीने आणि आपुलकीने अभयसाठी एवढं सगळं का करताय? म्हणजे मला असं वाटलं कि तो तुमच्या खूप जवळचा असेल वगैरे"  निखिलने परत प्रश्न केला. त्याला आज माहिती करूनच घ्यायचं होतं सगळं. 

"जवळचा असं काही नाही. पण अभयला जेव्हा पहिल्यांदा बघितलं होतं, तेव्हाच त्याच्याकडे मी एका अनामिक ओढीने खेचली गेले होते. का माहिती नाही, पण अभय मला माझ्या एका खूप जवळच्या अशा मित्रासारखा वाटला. त्याला पहिल्यांदा भेटून असं वाटतच नव्हतं, कि तो मला आताच भेटलाय. असं वाटत होतं कि,त्याच्याशी आपलं खूप जुनं नातं आहे. खूप जुनी ओळख आहे. आणि सोबतच एक अनामिक हुरहूर वाटत होती मनात. मी स्वतःला त्याचा विचार करण्यावाचून थांबवू नाही शकले. गंमत म्हणजे तेव्हादेखील त्याचा ऍक्सिडेंटच झाला होता. तेव्हादेखील मला त्याच्याबद्दल अशीच काळजी वाटत होती. जशी आता वाटतेय. जेव्हा तो परत गेला तेव्हा तो परत कधी भेटेल ह्याच्या प्रतीक्षेत मी होते. माझं मन सारखं त्याचाच विचार करत असे. त्याच्याचकडे सारखी ओढ घेत असे. एक अशी हुरहूर दाटून येत असे सारखी. जणूकाही तो माझा जिवलगच आहे कोणतरी. पण हे शक्य नव्हतं. कारण माझा जिवलग दुसराच कोणीतरी होता. म्हणून मी माझ्या मनाला अभयचा विचार करण्यापासून कसंतरी  थांबवलं. कारण मला त्याच्याशी प्रतारणा  करायची नव्हती. माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे म्हणूनच मी तेव्हा अभयचा विचार करणं सोडून दिलं होतं. पण ह्यावेळेस पण नेमकं तेच घडतंय. अभय समोर आला, कि सारखा त्याचाच विचार येतोय मनात. माझं मन पाहिल्यासारखंच त्याच्याकडे झेप घेतंय. त्याच्या  ओढीने कासावीस होतंय. तीच हुरहूर परत दाटून येतेय मनात. आणि आताही माझं प्रेम मला त्याचा विचार करण्यापासून थांबवतंय. अडकली आहे पूर्ण मी ह्या द्विधेमध्ये. नक्की काहीच कळत नाहीय मला. काय चाललंय माझं ते. एकीकडे माझं प्रेम आहे आणि एकीकडे हा अभय." ऋतिका बोलता बोलता  मध्येच थांबली. बोलताना तिने आपल्या मनातल्या खूप साऱ्या गोष्टी बाहेर काढल्या होत्या. ज्या तिने कधीच कोणाला बोलून नव्हत्या दाखवल्या. पण शेवटी त्या स्वतःहूनच बाहेर आल्या होत्या. आज पहिल्यांदा तिने आपलं मन मोकळं केलेलं होतं कोणासमोरतरी. अजून तिला खूप काही सांगायचं होतं तिला निखिलला आणि विचारायचं देखील होतं. पण त्याआधी आपल्या मनातलं जे बाहेर येतंय ते आधी तिने मोकळं करायचं ठरवलं. 

          निखिलला हे सगळं अपेक्षितच जणू काही. कारण त्याला पहिल्यापासून हे समजलं होतं. अभय आणि ऋतिका एकमेकांविषयी अगदी सारखाच  विचार करतात. दोघेही एकमेकांना त्याच ओढीने  भेटायचा प्रयत्न करतात पण शेवटी आपल्या लहानपणीच्या प्रेमापायी आणि त्यांना ते माहित नसल्या कारणाने स्वतःला अडवतात. ऋतिकाला अभयबद्दल तितकीच ओढ आहे जितकी अभयला आहे. तिचाही जीव अभयकडे तितकाच ओढला जातो जितका अभयचा तिच्याकडे. जसं अभय तिच्याविषयी बोलायचा  सगळं तसंच अगदी जसाच्या तसं ऋतिकाने निखिलला सांगितलं होतं. आता फक्त ऋतिका कडून चिऊ आणि म्याऊ हे दोन शब्द ऐकायचे होते त्याला. म्हणजे त्याला हे निश्चित झालं असतं कि दोघेही तेच चिऊ आणि म्याऊ आहेत. 

"बरं ऋतिका. चालेल ना डॉक्टर तुम्हाला ऋतिका म्हटलेलं" निखिलला पुढे आणखी जाणून घ्यायचं होतं. म्हणून तो ऋतिकाला तयार करत होता. 

"मी तर तुला तेच सांगतेय कधीपासून. आपण आता मित्र आहोत. मला ऋतिकाच म्हण. पण तूच ऐकत नव्हतास. सारखं तेच डॉक्टर डॉक्टर करत होतास." ऋतिका हलकेच नाक फुगवून म्हणाली. 

"बरं चालेल, मी तुम्हाला ऋतिकाच म्हणेन." निखिल हसत म्हणाला. 

"हो पण ते तुम्ही तुम्ही करतोय ना ते पण बंद कर नाहीतर मग डॉक्टरच ठीक आहे." ऋतिका म्हणाली. 

"नाही ऋतिका.  आता सवय झालीय त्याची त्यामुळे अरेतुरे करणं नाही जमणार नाही मला. मी तुम्हाला हृतिकच म्हणेन पण तुम्ही वगैरे करूनच. शेवटी तुम्ही वाहिनी आहात माझ्या." शेवटचं वाक्य निखिल तोंडातल्या तोंडात म्हणाला म्हणून ते ऋतिकाला ऐकू नाही आलं. 

"हं, बरं ठीक आहे. तुला जमेल तसं." ऋतिका म्हणाली. 

"पुढे काय ऋतिका मग?" निखिलने आणखी जाणून घेण्यासाठी तिला प्रश्न केला. 

"म्हणजे?" ऋतिकाला न कळून तिने विचारले. 

"म्हणजे हेच कि एवढंच आहे तुमच्या मनातलं कि अजून आहे काही." निखिल आपला गुगली टाकत म्हणाला. 

"हो आहे कि, सांगायचं आहे अजून तुला. कारण आज पाहिल्यांदा मी माझं मन मोकळं करतेय. पण त्याआधी थोडी रिफ्रेशमेंटची गरज आहे." ऋतिका असं म्हणून तिने दोन कॉफी आणायला सांगितल्या. निखिलला पण त्याची गरज होतीच म्हणा. 

               पाचच मिनिटांत एकजण दोन वाफाळत्या कॉफीचे मग घेऊन आला. ती कॉफी घेऊन ऋतिकाला जरा तरतरी आली. आणि ती पुढे सांगू लागली. 

"निखिल तुला माहितीय, मी अभयला का टाळतेय?" ऋतिकाने निखिलला प्रश्न केला. त्यावर निखिलने नकारार्थी मन हलवली. 

"कारण माझं पहिलं प्रेम" ऋतिका म्हणाली. 

"अच्छा म्हणजे तुम्ही दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करताय तर, आणि त्याच्यावरच्या प्रेमामुळे तुम्ही अभयला टाळताय. बरोबर ना?" निखिल ऋतिकाच्या बोलण्यात सहभागी होत होता. 

"हो." ऋतिका म्हणाली. 

"मग कोण आहे तो नशीबवान जो तुमचं पाहिलं प्रेम आहे. मला पण एकदा भेटायचं आहे त्याला." निखिल म्हणाला. 

"नाही भेटू शकत तू त्याला. कारण मलाच तो अजून भेटलेला नाहीय." ऋतिका उदास होत म्हणाली. 

"म्हणजे? मी समजलो नाही." निखिल न कळण्याचा आव आणत म्हणाला. 

" म्हणजे,  माझं पाहिलं प्रेम म्हणजे माझा लहानपणीचा मित्र आहे. म्याऊ त्याचं नाव." ऋतिका म्हणाली तसं अभयने जोरात श्वास घेतल्यासारखा आवाज आला. ऋतिकाने आणि निखिलने एकदमच तिकडे बघतीलं आणि त्याच्याजवळ आले. पण कसलीच हालचाल नाही हे पाहून ऋतिकाने त्याला तपासलं. त्यांना वाटलं कि भास झाला असेल, म्हणून ते परत खिडकीजवळ आले. 

तिच्या तोंडून म्याऊ हे नाव ऐकताच निखिलला खात्री पटली, कि ऋतिकाच चिऊ आहे. त्याला खूप आनंद झाला. पण चेहऱ्यावर तसं न दाखवता तो ऋतिकाचं पुढचं बोलणं ऐकू लागलं. तिने निखिलला चिऊ आणि म्याऊबद्दल सगळं सांगितलं. आणि शेवटी म्हणाली,
"आम्ही लहान असताना तो अचानकच तो एक दिवस न सांगता कुठंतरी निघून गेला.  ते अजून त्याचा काहीच पत्ता नाहीय. मी नंतर त्याला खूप शोधलं, पण त्याचा काहीच पत्ता नाही लागला. मग शेवटी त्याला शोधून शोधून तो परत येईल म्हणून मी त्याची वाट पाहण्याचं ठरवलं. अभय जेव्हा भेटला तेव्हा मला एकवेळ असंच वाटलं तोच माझा म्याऊ असावा. त्याच्याशी एकदा बोलेन ह्यावर म्हटलं तर तो परत मला भेटलाच नाही. आणि तो आता काही विचारायच्या अवस्थेमध्ये पण नाहीय. म्हणून मी तुझ्याशी बोलायचं ठरवलं." ऋतिका म्हणाली. 

"हो बरं केलंत ते तुम्ही तुमचं मन मोकळं केलंत ते. कदाचित मी तुमची काही मदत करू शकतो यामध्ये. आपण दोघे मिळून तुमच्या म्याऊला शोधुयात चला." निखिल म्हणाला. 

" थँक यू. पण निखिल तू काय मदत करणार आहेस मला. तू तर त्याला ओळखत पण नाहीस. मलाही माहित नाही कि तो आता कसा दिसतोय. कारण लहानपणीच्या आणि आताच्या म्याऊमध्ये खूप बदल झाला असेल. " ऋतिका म्हणाली. 

"हो. ओळखत नसलो म्हणून काय झालं. तरी पण मी तुमची काही ना काही मदत नक्कीच करू शकतो." निखिलला चान्स सोडायचा नव्हता. कारण तो अगदी जवळ पोचला होता. 

"बरं." असं म्हणून ऋतिका काय करता येईल याचा विचार करू लागली. तिने घडल्यात बघितले तर अजून एक तास होता तिला निघायला. म्हणून त्यावेळेत निखिलची काही मदत होईल का ह्यावर बोलायचं तिने ठरवलं. 

"मी काय म्हणतोय ऋतिका, तुमच्याकडे म्याऊची ओळखीची अशी एखादी काही वस्तू आहे का, कि ज्यावरून आपण त्याला शोधू शकू. म्हणजे त्याचा एखादा फोटो वगैरे असं काही." निखिल म्हणाला. 

"हो आहे. आमच्या दोघांचा लहानपणी एकत्र काढलेला फोटो आहे माझ्या केबिनमध्ये." ऋतिका म्हणाली, "पण त्यावरून कसं शोधता येईल त्याला?" ऋतिकाने प्रश्न केला. 

"येईल नक्कीच. कारण आजच्या घडीला कोणाला शोधणं म्हणजे काही अवघड राहिलेलं नाहीय सोशल मीडियाच्या मदतीने. मला तो फोटो बघता येईल का ऋतिका?" असं म्हणून निखिलने तो फोटो बघायची इच्छा दर्शवली. 

"हो बघता येईल. माझ्या केबिनमध्ये आहे. थांब मी घेऊन येते." असं म्हणून ऋतिका आपल्या केबिनकडे जायला निघाली. तेव्हा निखिल तिला थांबवत म्हणाला,
"ऋतिका, तुम्ही तो फोटो काढून ठेवा. मीच येतो तुमच्या केबिनमध्ये. तुम्ही व्हा पुढे, मी आलोच."

"बरं ठीक आहे. चालेल." असं म्हणून ऋतिका निघून गेली. 

                 ऋतिका निघून गेल्यावर दार बंद झाल्याचे पाहून निखिल अभयजवळ आला. त्याच्या बाजूला बसून त्याने त्याचा सलाईन लावलेला हात हातात घेतला आणि म्हणाला,
"अभय, मित्रा आता तरी तुला उठावंच लागेल लेका. जिच्यासाठी तू एवढे दिवस तडफडत होतास, ती चिऊ आज जवळ आहे तुझ्या. होय ऋतिकाच तुझी चिऊ आहे. मी घेऊन येतोय तुझ्या चिऊला तुला तिच्या म्याऊला भेटायला." असं म्हणून डोळ्यातलं पाणी पुसून निखिल ऋतिकाच्या केबिनच्या दिशेने निघाला. जाताना त्याने अभयच्या लहानपणीचा तो चिऊ आणि म्याऊचा फोटो सोबत घेतला. कारण त्याला खात्री झाली होती कि, ऋतिका जवळ पण हाच फोटो असणार म्हणून. 

              निखिलने दारावर टकटक केले. तेव्हा ऋतिकाने दार उघडंच असल्याचं सांगितलं. निखिल आत आल्यावर त्याने पाहिलं कि, ऋतिका तिच्या खुर्चीवर एक फोटो हातात घेऊन बसली होती. तिचं लक्ष नाही हे पाहून निखिलने आपल्यासोबत आणलेला फोट हळूच आपल्या जॅकेटच्या खिशात लपवला.

             घास खाकरत त्याने ऋतिकाचं लक्ष खेचून घेतलं. फोटो पाहण्यात गुंतलेल्या ऋतिकाला निखिल आल्याचं लक्षातच नव्हतं राहिलं. तिने वरमून निखिलला तो फोटो दाखवण्यासाठी त्याच्याकडे दिला. 

"हा बघ. हाच एक फोटो आहे माझ्याकडे आमचा. लहानपणी खेळत असताना अचानक अभयच्या आजीने तो फोटो काढला होता. माझ्याकडे हा एक फोटो त्यांनीच दिला होता. आमची लहानपणीची एक आठवण म्हणून. आणि ती एकच आठवण माझ्याकडे राहिली होती." ऋतिका म्हणाली. 

            निखिलने  तो फोटो हातात घेऊन बघितला तसं त्याला एखादा खजाना मिळाल्यासारखा आनंद झाला. त्याच्या अपेक्षेप्रमाणे हा सेम तसाच फोटो होता जो अभयजवळ होता. त्याला आता सगळ्या गोष्टी कळून चुकल्या होत्या. आजपर्यंत जेवढ्या काही घटना अभय आणि ऋतिकाच्या बाबतीत घडल्या  होत्या, त्याचा अर्थ त्याला लागला होता. अतिशय आनंदाने उड्या माराव्यात आणि असंच ह्रतिकला घेऊन त्याच्या मित्राकडे अभयकडे घेऊन जावं आणि त्यांना एकमेकांना मिळवावं असं त्याला मनापासून वाटत होतं. पण त्याने आपल्या मनाला आवर  घातला आणि ऋतिकाला ह्याबद्दल सांगण्यासाठी तिच्याकडे वळला. कारण त्याला अजून ऋतिकाला  आणि अभयला लांब ठेवायचं नव्हतं. 

"ऋतिका, हा फोटो बघून मला तर असंच वाटतंय कि तुमचा म्याऊ तुम्हाला नक्की भेटेल." निखिल गूढ हास्य चेहऱ्यावर आणत म्हणाला. 

त्याच्या बोलण्याचा रोख न कळल्यामुळे ऋतिका गोंधळून त्याला म्हणाली,
"निखिल मस्करी नको करुस. हे कसं शक्य आहे कि, लहानपणीच्या फोटोवरून म्याऊ लगेच भेटेल मला. तसं असतं तर आतापर्यंत तो मला भेटायला हवा होता. मग का नाही भेटला? सांग."

"कारण त्याला आता भेटायचं होतं तुम्हाला. म्हणून कदाचित अजूनपर्यंत नसेल भेटला तुम्हाला" निखिल तोच गूढपणा कायम ठेवत म्हणाला. 

"म्हणजे?" ऋतिका गोंधळलेलीच होती. 

"म्हणजे असं कि. . . " आपलं बोलणं मध्येच थांबवत निखिल म्हणाला. त्याला ऋतिकाला सांगायचं होतं पटकन पण तेच जमत नव्हतं त्याला. 

"म्हणजे काय निखिल? बोल लवकर." ऋतिकाच्या हृदयात आता जोरजोरात धडधड करू लागलं होतं. 

"माझ्याकडे तुम्हाला दाखवण्यासाठी एक गोष्ट आहे." निखिल म्हणाला. 

"कुठली गोष्ट?" ऋतिका अधीरतेने म्हणाली. 

"दाखवतो."असं म्हणून  निखिलने आपल्या जॅकेटच्या आतमधून ती  फोटो फ्रेम बाहेर काढली आणि ऋतिकाकडे पाहत म्हणाला,
"दिल थामके रखियेगा ऋतिकाजी आपके लिये एक बोहोत बडा सरप्राईज है."

"बघू" असं म्हणत धडधडत्या काळजाने ऋतिकाने ती फोटो फ्रेम बघितली आणि तिला आश्चर्याचा एक  खूप मोठा धक्का बसला. त्यातच ती जोरात खुर्चीवर बसली. निखिल तिला सावरायला पुढे झाला. तो फोटो बघून तिच्या डोळ्यांतून अश्रू  वाहू लागले. तिला काय बोलावं हेच कळत नव्हतं. आश्चर्याचा आणि सुखाचा धक्का तिला एकदमच बसला होता.  तिला विश्वासच बसत नव्हता, कि आपल्याकडे आहे तसाच फोटो निखिलकडे कसा काय आला? तिने निखिकडे तशाच भरल्या डोळ्यांनी पाहून विचारले,
"हा फोटो तुझ्याकडे कसा आला? हा फोटो आजीने मला आणि म्याऊलाच दिला होता. हा फोटो फक्त म्याऊकडेच असू शकतो. म्हणजे तूच . . . "

निखिलला हे अनपेक्षित होतं. तिच्या प्रश्नाने तो बावचळला आणि म्हणाला,
"नाही नाही ऋतिका, मी नाहीय म्याऊ. मला तो फोटो भेटला होता एकाकडे आणि तो मला तुम्हाला  दाखवायचा होता म्हणून मी तो घेऊन आलो." 

"तू म्याऊ नाहीस मग तुला कोणाकडे हा फोटो भेटला. हा एक अतिशय पर्सनल विषय आहे निखिल. सांग मला तुला हा फोटो कोणाकडे भेटला? कुठे आहे माझा म्याऊ?" ऋतिकाचा आवाज तिच्याही न कळत वाढला होता. 

"ऋतिका, शांत व्हा प्लिज. मी घेऊन जातो तुम्हाला तुमच्या म्याऊकडे. चला माझ्यासोबत. या." निखिल म्हणाला. आता त्यालाही चिऊ आणि म्याऊची भेट लांबवायची नव्हती. पण ऋतिकाने जर तिच्या म्याऊला ह्या अवस्थेमध्ये  बघितलं  तर तिला काय वाटेल हेच निखिलला कळत नव्हतं. आपलं प्रेम इतक्या वर्षांनी आपल्याला भेटणार आणि तेदेखील अशा अवस्थेमध्ये, हा विचार करूनच निखिलला खूप वाईट वाटले. पण निदान ऋतिकाला खात्री तरी पटेल कि अभयच म्याऊ आहे म्हणून आणि ती तिच्या म्याऊला भेटेल तरी. 
 
"हो चल, आता मी नाही राहू शकत. चल. तू म्हणशील तिथे मी यायला तयार आहे माझ्या म्याऊला भेटायला. प्लिज मला एकदा भेटव त्याला." रडवेल्या आवाजात ऋतिका म्हणाली. 

"चला माझ्यासोबत" असं म्हणून निखिलने त्या दोन्ही फोटोच्या फ्रेम्स सोबत घेतल्या आणि ऋतिकाला घेऊन निघाला तिच्या लहानपणीच्या प्रेमाला भेटवायला. 

               ते दोघे अभयच्या रूमजवळ येऊन थांबले. निखिलने पुढे होत त्या रूमचा दरवाजा उघडला आणि ऋतिका त्याच्या मागोमाग आत गेली. निखिलने आपल्याला अभयच्या रूममध्ये का आणलंय हे न समजून ती निखिलला म्हणाली,
"आपण अभयच्या रूम मध्ये कशाला आलोय निखिल? काय म्याऊ इकडे येणार आहे का?"

"इकडे येणार नाहीय ऋतिका तो. तो तर इथेच आहे. दीड महिना झाला. कोमामध्ये आहे तो. तो बघा जो ह्या बेडवर झोपलाय तोच अभय तुमचा म्याऊ आहे." आपल्या डोळ्यांत आलेलं पाणी पुसत निखिल कसाबसा म्हणाला. 

                ऋतिका शॉक बसल्यासारखी एकवेळ अभयकडे आणि निखिलकडे पाहत होती. तिला हसावं कि रडावं तेच कळेना. तिच्या सगळ्या भावना उत्कटतेने अक्षरशः भरून आल्या होत्या. इतक्या कि, जर कोणी तिच्या आतमध्ये डोकावून पाहिलं असतं तर कदाचित त्याला कळलं असतं कि, तिच्या आतमध्ये काय चालू आहे ते. अनाकलनीय अशा भावनांच्या वादळात ती सापडली होती. काहीच न सुचून स्तब्ध झाली होती ती. म्याऊ आपलं लहानपणीचं प्रेम आपल्या समोर आहे. तो अभय आहे. त्याचा ऍक्सीडेन्ट झालाय. गेला दीड महिना झालं तो कोमामध्ये आहे. कधी शुद्धीवर येईल ते माहिती नाहीय. औषधं आणि सलाईन्सवर मशीनमधली त्याच्या आयुष्याची रेषा सुरळीत चालू आहे. नियतीने तिची अजब थट्टा केली होती. तिचं प्रेम तिला परत मिळवून देऊन  पण तिच्यापासून दूरच ठेवलं होतं.  जणू नियतीच्या मनात त्यांचं मिलन होऊ द्यायचं अजून बाकी होतं. 

                ज्याची आपण इतके दिवस, इतकी वर्षं वाट पहिली. तो भेटावा म्हणून उपासतापास केले. सगळ्या देवांना नवस बोलले. त्याच्यावरच्या प्रेमाखातर कुणाकडे ढुंकूनही पाहिलं नाही. फक्त त्याचीच वाट पाहत राहिले आजवर आणि तो आपल्याला भेटावा तेही अशा अवस्थेमध्ये. याआधी तो कितीतरी वेळा आपल्यासमोर आलेला. आपल्याला एकवेळ वाटलं कि, तोच म्याऊ आहे पण आपण कसलीच शहानिशा न करता त्याला का जाऊ दिलं ह्याचाच ती विचार करत होती आणि स्वतःला दोषी मानत होती. जेव्हा आपल्याला तसं वाटलं होतं तेव्हाच का नाही आपण त्याला विचारलं? तिला प्रत्येक गोष्ट आठवत होती. अभय भेटलेला प्रत्येक क्षण तिच्या डोळ्यांसमोर येत होता. तो म्याऊच होता. म्हणूनच आपल्याला त्याच्याबद्दल ती ओढ वाटत होती. त्याच्याशी खूप जुनी ओळख असल्यासारखं वाटत होतं. त्याच्याबद्दल आपुलकी वाटत होती. काळजी वाटत होती. आपल्यामध्ये एक नातं आहे ते वाटत होतं. म्हणूनच तो जेव्हा जेव्हा भेटला तेव्हा तेव्हा आपल्याला त्याच्याबद्दल ती उत्कट भावना जाणवत होती. त्यांच्यात असणाऱ्या त्या अनामिक ओढीचं, त्या अनोळखी प्रेमाचं रहस्य तिला आता उलगडलं होतं. तिचं प्रेम तिला परत भेटलं होतं. तिचा म्याऊ तिला भेटला होता. पण म्याऊला अजून त्याची चिऊ भेटायची बाकी होती.