Search This Blog

Saturday, May 1, 2021

अनोळखी हे प्रेम - Part 9

 



            आज जवळपास दीड महिना उलटून गेला होता. अभय अजून शुद्धीवर आला नव्हता. निखिल आणि ऋतिका नेहमी अभयजवळच असत. निखिल कंपनीची सगळी जबाबदारी घेऊन काम करत होता. अभयसारखं जमत नव्हतं, पण बॉबी अंकलच्या मदतीने तो करत होता. त्याने कसबसं सगळं व्यवस्थित हाताळलं होतं. कंपनीची जबाबदारी, अभयची काळजी घेणं हे तो सख्या भावापेक्षा जास्त करत होता. ते खरंच  म्हणतात, देव ज्यांना आपल्या रक्ताच्या नात्यात बांधायला विसरतो त्यांना मित्र म्हणून पाठवतो. निखिल अभयला मित्रापेक्षा जास्त जपत होता. कारण अभयने त्याला काळजाशी लावलं होतं आणि तोही अभयला आपल्या जिगरका टूकडाच मानत होता. बस, आता अभय लवकरात लवकर शुद्धीवर यावी म्हणून तो देवाला विनवत होता.  

               ऋतिकाने तर अभयच्या काळजीमध्ये सगळ्या गोष्टी करून पहिल्या होत्या. गणपती बाप्पाला विनवण्यापासून ते उपासतापास सगळं केलं होतं. आपण हे सगळं का करतोय हेच तिला कळत नव्हतं. तिच्याही नकळत ती ह्या सगळ्या गोष्टी करत होती. ह्याचंच तिला जास्त आश्चर्य होतं. आपल्या केबिनमध्ये असली कि, म्याऊच्या फोटोकडे बघत त्याच्या आठवणींमध्ये गुंतलेली असायची आणि अभयकडे असली कि त्याच्या काळजीत असायची. तिच्या मनाची नुसती घालमेल चालू होती. मन सारखं अभयकडे ओढ घ्यायचं, पण म्याऊ आठवला कि लगेच माघारपण घ्यायचं. विश्वासघाताची भावना लगेच तिच्या मनात घर करायची. तिला हेच कळायचं नाही, कि आपण अभयसाठी एवढं सगळं का करतोय? उत्तरादाखल तिला एवढंच मिळायचं कि आपल्याला त्याच्याबद्दल एक अनामिक ओढ आहे. एक अनोळखी नातं आहे आपल्यात. जे तिच्याकडून हे सगळं करवून घेतंय. 

                   नेहमीप्रमाणे आजपण सकाळी सकाळी ऋतिका मंदिरात गेली होती. बाप्पांचा आशीर्वाद घेऊन प्रसाद घेण्यासाठी ती महाराजांकडे वळली, तसं तिला जाणवलं कि ते  तिच्याकडेच  एक गूढ हास्य घेऊन  बघत आहेत. ते महाराज तिच्या चांगलेच ओळखीचे होते. ती मंदिरात रोज येत असल्यामुळे महाराज तिला ओळखत होते. बाप्पांचं दर्शन घेऊन त्यांच्याकडून प्रसाद घेऊनच ती जात असे. त्यामुळे त्यांना तसं हसताना पाहून ऋतिका त्यांना विचारणार इतक्याच तेच तिला म्हणाले, 
"खूप विचार आहेत ना डोक्यात. आपण काय करतोय? कशासाठी करतोय? हे कळत नसताना सुद्धा सगळं तू निःस्वार्थपणे करतेयस. त्याचंच फळ तुला लवकर मिळणार आहे पोरी. जवळ आहेस खूप तू. इतकी कि फक्त एक पातळ पडदा आहे मध्ये. तो हटला कि तुला तुझं इच्छित फळ मिळेल."

त्यांच्या बोलण्याचा अर्थ न समजून ऋतिका म्हणाली,
"काय बाबा, काय मिळणार आहे? कसलं फळ? कशाच्या जवळ आहे मी " 

"इतके दिवस ज्याची तू वाट पाहिलीस तो अगदी जवळ आलाय तुझ्या. इतका जवळ कि तुझ्या डोळ्यांसमोर आहे तो. फक्त ओळख पोरी. त्याला ओळखलंस कि, सगळं कोडं सुटून जाईल तुझ्या मनातलं." असं बोलून बाबा तिला प्रसाद देऊन आणि आशीर्वाद देऊन मंदिराच्या गाभाऱ्यात निघून गेले. 

             आपल्याबद्दल ह्यांना कसं कळलं? आणि इतके दिवस ते काहीच कसे नाही बोलले आपल्याला? ह्याचं तिला आश्चर्य वाटलं. त्यांच्या बोलण्याच्या विचार करण्याच्या नादात ते कधी निघून गेले तिला समजलंच नाही. त्यांना विचारावं म्हणून ती त्यांना शोधू लागली. पण तिला ते दिसलेच नाहीत. म्हणून मग ती नाईलाजाने शेवटी ती परत एकदा गणपती बाप्पांच्या पाय पडून निघाली. 

               मंदिरातल्या महाराजांच्या बोलण्याचा ती हॉस्पिटलला पोहचेपर्यंत विचार करत होती. त्यांना नक्की काय सुचवायचे आहे हे तिला कळेचना. आपण जवळ आहोत खूप. भेटणार आहे आपल्याला तो. समोरच आहे तो आपल्या. पण कुठे. जर ते महाराज म्याऊ बद्दल बोलत असतील तर कुठे आहे तो. आणि आपल्याला कसं ओळखता नाही आलं मग? तिला एक वेळ असंही वाटलं, कि ते अभयबद्दल तर बोलत नसावेत. पण हे शक्य नाही. कारण तिला त्याबद्दल खात्री वाटत नव्हती. ह्याबद्दल तिने याआधीही विचार केला होता. त्यामुळे तिला माहिती होतं कि तो अभय नाहीय ते. पण मग जर अभय नसेल तर आणखी कोण आपल्या जवळ आहे ज्याची आपल्याला हल्ली नवीनच ओळख झालीय. विचार करता करता तिला आठवलं, निखिल ! कदाचित  तो निखिल तर नसेल. हो निखिल. कारण त्याच्याशी आपली इतक्या कमी वेळात खूप चांगली ओळख झालीय. आपण आजवर कुणाशी इतक्या चांगल्या प्रकारे मिसळलो नव्हतो. निखिलसोबतआपली खूपच चांगली मैत्री जुळलीय. पण मग जर निखिल म्याऊ असता तर आपल्याला अभयबद्दल ती अनामिक ओढ का वाटतेय? आपण त्याच्यात का एवढं गुंततोय? त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये एवढी ओढ का आहे? नाही तो निखिल नसेल. जर तो अभय नाहीय असं आपल्याला वाटतं आणि तो निखिलसुद्धा नाहीय मग आपला म्याऊ नक्की आहे तरी कोण? 

                 विचार करून करून ऋतिकाचं डोकं बधिर झालं होतं. ह्या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावायचाच असं ठरवून तिने आजच्या दिवसाला सुरुवात केली. अभयशी तर काही बोलता येणार नाही, कारण तो शुद्धीवर नाहीय आणि निखिलशी बोलायचं तर आजच बोलून घेऊ असं तिने ठरवलं.  त्यासाठी तिला वेगळा वेळ काढावा लागणार होता. म्हणून तिने तिच्या हॉस्पिटलमधल्या सगळ्या अपॉईंटमेंट्स पटापट उरकून घेतल्या आणि मोकळी झाली. तिच्या नशिबाने तिला आज फार काही अपॉईंटमेंट्स नव्हत्या आणि फक्त रुटीन चेकअप. ते तिने पटकन यावरून घेतलं. आपण एवढ्या पटापट काम करू शकतो ह्याचं तिला आश्चर्यच वाटलं. कारण याआधी तिने अशी घाई कधीच केली नव्हती. प्रत्येक पेशण्टशी व्यवस्थित बोलून सावकाश त्यांच्यावर ट्रीटमेंट करत होती. 

            तिने घडाळ्यात पहिले तर चार वाजले होते. म्हणजे अजून तिला तिच्या क्लिनिकला जायला भरपूर वेळ होता. चांगले तीन तास तिच्या हातात होते. त्याचा उपयोग करून ती निखिलशी सगळं बोलणार होती. फक्त मनोमन एकच प्रार्थना करत होती, कि मध्येच काही इमरजेंसी  नको यायला. नाहीतर परत असा  वेळ तिला लवकर भेटणार नव्हता. 

           ऋतिका अभयच्या रूम मध्ये आली तेव्हा तिथे निखिल नव्हता. बहुतेक त्याच्या कामासाठी बाहेर गेला असेल. आज तिच्याकडे मोकळा वेळ असल्यामुळे ती एक एक गोष्ट न्याहाळू लागली. अभय गाढ झोपेत असल्यासारखा पडून होता. गेला दीड महिना तो अशाच गाढ झोपेत होता. ती त्याच्या बेड जवळ असलेल्या सोफ्यावर बसली. अभयकडे पाहून तिला कसनुसंच झालं. प्रत्येक वेळेला हा आपल्याला भेटतो आणि लगेच दूर निघून जातो. ह्यावेळेस भेटला आणि जवळ असूनपण  असा दूरच राहिला.  आणि आपला म्याऊ तर अजून भेटलेलाच नाहीय आपल्याला. ती विचार करत करत रूम मध्ये नजर फिरवत होती. इतके दिवस आपण असं निवांत बसलोच नव्हतो अभयजवळ. अभय असलेली रूम चांगली ऐसपैस होती. प्रत्येक आधुनिक उपचारपद्धतीची साधनं तिथे  होती. प्रत्येक वेळेला लागणारी औषधं आणि इंजेक्शनं आधीपासूनच आणून ठेवली होती. एका कोपऱ्यात वरती मस्त रूमफ्रेशनर लावलेला होता. त्याचा मंद सुगंध दरवळत होता. त्यामुळे तिला क्षणभर आपण हॉस्पिटलमध्ये नाहीच आहोत असा भास झाला. कारण बाहेरच्या वातावरणात आणि त्या रूमच्या वातावरणात खूप फरक होता. त्याच्या रूमला मोठ्या मोठ्या हवेशीर खिडक्या होत्या, पण त्याची एसी रूम असल्यामुळे त्या बंद होत्या. तिने त्यावरील पडदे बाजूला सारले तशी  संध्याकाळची  सूर्याची कोवळी किरणं आत शिरली. आपल्या हॉस्पिटलने अभय साठी  एवढी प्रशस्त आणि आधुनिक रूम का दिली हेच तिला कळलं नाही. आपल्या हॉस्पिटलध्ये अशा रूम्स फक्त श्रीमंत, खूप श्रीमंत लोकांसाठी दिल्या जातात हे तिला माहिती होतं आणि अभय तिला वाटत नव्हतं कि तो इतका श्रीमंत असावा. त्याच्या रूमच्या बाहेर नेहमी असणाऱ्या दोन गार्ड्सना बघून तिला थोडं खटकलंच होतं. पण तिने चाललेल्या गोंधळामुळे एवढं लक्ष दिलं नव्हतं. कदाचित निखिलने केलं असेल त्याच्यासाठी. तसंपण निखिल आहेच म्हणा श्रीमंत, त्याने केलं असेल आपल्या मित्रासाठी. असाही विचार तिच्या मनात डोकावला. पण असो. प्रश्न तो नाहीय. आपल्याला अभयशी घेणंदेणं आहे,  त्याच्या कोण असण्याशी नाही. असं म्हणून मनात येऊ पाहणारा गरीब श्रीमंत भेदभावाचा विचार तिने तात्काळ झटकून टाकला.  
             
              ऋतिका अभयच्या रूम मध्ये पाहून निखिलला आश्चर्य वाटलं नाही. पण ती अशी निवांत बसलेली पाहून गोंधळला.  कारण अभयच्या रूमचा ऍक्सेस फक्त निखिल आणि ऋतिका जवळ आणि हॉस्पिटलमधल्या काही ठराविक लोकांजवळच होता. त्यानेच तशी सुरक्षितता करवून घेतली होती. निखिल आलेला पाहून ऋतिका त्याच्याजवळ आली. तिला तसं पाहून निखिलला वाटलं कि खास त्याच्याशी बोलायलाच आली आहे. तसं असेल तर निखिलला देखील बरंच होतं. कारण तो हि त्याचीच वाट बघत होता. शेवटी त्यालाही काही गोष्टी अभयच्या वतीने स्पष्ट करायच्या होत्या. 

"हाय निखिल." ऋतिका म्हणाली. 

"बोला, डॉक्टरसाहेब. आज निवांत दिसताय." निखिल शक्य तितका मोकळेपणा ठेवायच्या प्रयत्नाने म्हणाला. 

"हो. ते आज काही खास काम नव्हतं आणि माझी कामंदेखील झाली होती सगळी. फ्री होते म्हणून म्हटलं इथे यावं जरा वेळ." ऋतिका म्हणाली. 

"अच्छा म्हणजे डॉक्टरांना पण फ्री वेळ भेटतो तर" असं म्हणून निखिल डोळे मिचकावत हसला. 

"हो म्हणजे भेटतो कधी तरी. शेवटी नाही म्हटलं तरी आम्ही पण माणसंच आहोत ना आणि आम्हालाही वाटतं थोडा वेळ आम्हालाही मोकळा भेटावा. नाही का ? " ऋतिका पण निखिलच्या हसण्यात सामील होत म्हणाली. 

"म्हणजे काय डॉक्टर. जरूर जरूर. उलट मी तर म्हणतो कि डॉक्टरांसाठीपण आमच्या सारखे काही ठराविक तास असायला हवेत. किती प्रेशर असतं तुमच्या लोकांना. हा झाला कि तो पेशंट तो झाला कि परत दुसरा. सारखी लाईनच असते पेशंट्सची." 

"तसं असून कसं चालेल निखिल. जर आम्हाला असे ठराविक काम करायची सवय लागली तर एखाद्या इमरजेंसीच्या वेळेस कोणी उपलब्ध नाही होणार. कारण कधी काही इमरजेंसी येईल ते सांगू नाही शकत. म्हणून आम्हाला दिवसातल्या कुठल्याही वेळेला पेशंट सांभाळण्यासाठी तयार असावं लागतं. नाहीतर मग लोकांचा डॉक्टरांवरील विश्वास उडून ते अंधश्रद्धेकडे वळायला वेळ नाही लागणार."  ऋतिका म्हणाली. 

"हो डॉक्टर, ते पण आहेच. म्हणून तर तुम्हा डॉक्टर लोकांना समाजात एक वेगळाच मान आहे. सॅल्यूट टू यू" असं म्हणून निखिलने ऋतिकाला सॅल्यूट ठोकला.

"काहीतरीच काय निखिल. कर हात खाली तो आधी " असं म्हणून ऋतिका हसायला लागली. कारण निखिल सेम शाळेतल्या मुलासारखा वेडावाकडा हात डोक्याला लावून सॅल्यूट ठोकून उभा होता. ते पाहून ऋतिकाला हसायला येत होतं. निखिल पण हसू लागला. 

हसता हसता तो ऋतिकाला म्हणाला,
"डॉक्टर, अजून किती दिवस लागतील माझ्या मित्राला ह्यातून बाहेर पडायला." निखिलचं लक्ष अभयकडे होतं. त्याला असं मध्येच इमोशनल झालेलं पाहून ऋतिका म्हणाली,
"आपल्या हातामध्ये नाहीय ते निखिल. ते सगळं बाप्पाच्या हातात आहे. आम्ही जेवढं होईल तेवढं सगळं ट्राय करतच आहोत. जेवढी बेस्ट ट्रीटमेंट देता येईल तेवढी आम्ही देतोय. बाकी सगळं त्याच्या हातात आहे."

"हम्म" असं म्हणून निखिल अभजवळ जाऊन बसला. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाला,"अभ्या यार उठ लवकर. अजून किती दिवस असा झोपून काढणारेस साल्या. उठ यार. तुझ्याशिवाय मन नाही लागत. तूच म्हणतो ना, तुझ्याशिवाय कोणी मित्र नाही माझा. पण हे तुला कसं नाही माहित कि, मलापण तुझ्याशिवाय कुठला मित्र नाहीय. तू अकेलाही मेरी जान है यार. उठ जा यार." असं म्हणून त्याच्या डोळ्यांतून येणारं पाणी पुसायला तो ऋतिकाकडे पाठ करून खिकडीजवळ जाऊन उभा राहिला. 

त्याला तसं इमोशनल झालेला पाहून ऋतिकाला खूप वाईट वाटलं. पण ती तरी काय करू शकत होती. निखिलला सावरण्यासाठी ती त्याला म्हणाली,
"निखिल, सावर स्वतःला. येईल अभय लवकरच शुद्धीवर. मलादेखील त्याची खूप काळजी वाटतेय. तो लवकरात लवकर शुद्धीवर यावा यासाठी मी पण खूप प्रयत्न करतेय.  पण मीसुद्धा हतबल आहे रे." असं म्हणून ती सुद्धा भावनेच्या भरात काही बोलू न शकल्यामुळे शांत झाली. 

"हो. माहितीय मला डॉक्टर. पाहत आलोय मी सगळं. ऍक्सीडेन्ट झाल्या क्षणापासून तुम्ही अभय साठी खूप काही केलंय. त्यासाठी खरंच मी खूप आभारी आहे तुमचा. पण डॉक्टर एक विचारू तुम्हाला?" निखिलने हीच योग्य वेळ असं समजून ऋतिकाला विचारले. 

"हो विचार ना निखिल? परवानगी काय घेतोयस?" ऋतिका स्वतःला नॉर्मल करत म्हणाली. 

"नाही म्हणजे थोडं पर्सनल आहे म्हणून" निखिल सावधगिरीने म्हणाला. 

"अरे आता आपण चांगले मित्र आहोत. सो डोन्ट वरी. विचार बिनधास्त" ऋतिका म्हणाली. 

"तुम्ही अभयला ओळखता का? म्हणजे कधीपासून ओळखता त्याला?" निखिलने पहिला प्रश्न केला. 

"हो ओळखते मी त्याला. म्हणजे असं पक्कं नाही सांगता येणार. पण काही वर्षांपूर्वी असाच अभय एकदा आमच्या घराजवळ ऍक्सीडेन्ट झालेला म्हणून भेटला होता. त्याच्यासोबत आणखी एकजण होता. तेव्हा मी  एम.बी.बी. एस. करत होते." ऋतिका म्हणाली. 

"अच्छा, म्हणजे फक्त एकदाच भेटलेलात तुम्ही?" निखिलने परत प्रश्न केला. 
 
"नाही. त्यांनतर परत एकदा आलेला तो. बहुतेक कुठंतरी बाहेर चाललेला तो. कदाचित त्यासाठीच तो मला भेटायला आला असेल. करणं त्यांनतर तो परत कधीच दिसला नाही आणि  भेटला ते आताच आणि तेही असं झालं" ऋतिका आठवत म्हणाली. 

"हम्म बरं. पण एवढीच ओळख आहे तुमची तर. मग तुम्ही एवढ्या काळजीने आणि आपुलकीने अभयसाठी एवढं सगळं का करताय? म्हणजे मला असं वाटलं कि तो तुमच्या खूप जवळचा असेल वगैरे"  निखिलने परत प्रश्न केला. त्याला आज माहिती करूनच घ्यायचं होतं सगळं. 

"जवळचा असं काही नाही. पण अभयला जेव्हा पहिल्यांदा बघितलं होतं, तेव्हाच त्याच्याकडे मी एका अनामिक ओढीने खेचली गेले होते. का माहिती नाही, पण अभय मला माझ्या एका खूप जवळच्या अशा मित्रासारखा वाटला. त्याला पहिल्यांदा भेटून असं वाटतच नव्हतं, कि तो मला आताच भेटलाय. असं वाटत होतं कि,त्याच्याशी आपलं खूप जुनं नातं आहे. खूप जुनी ओळख आहे. आणि सोबतच एक अनामिक हुरहूर वाटत होती मनात. मी स्वतःला त्याचा विचार करण्यावाचून थांबवू नाही शकले. गंमत म्हणजे तेव्हादेखील त्याचा ऍक्सिडेंटच झाला होता. तेव्हादेखील मला त्याच्याबद्दल अशीच काळजी वाटत होती. जशी आता वाटतेय. जेव्हा तो परत गेला तेव्हा तो परत कधी भेटेल ह्याच्या प्रतीक्षेत मी होते. माझं मन सारखं त्याचाच विचार करत असे. त्याच्याचकडे सारखी ओढ घेत असे. एक अशी हुरहूर दाटून येत असे सारखी. जणूकाही तो माझा जिवलगच आहे कोणतरी. पण हे शक्य नव्हतं. कारण माझा जिवलग दुसराच कोणीतरी होता. म्हणून मी माझ्या मनाला अभयचा विचार करण्यापासून कसंतरी  थांबवलं. कारण मला त्याच्याशी प्रतारणा  करायची नव्हती. माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे म्हणूनच मी तेव्हा अभयचा विचार करणं सोडून दिलं होतं. पण ह्यावेळेस पण नेमकं तेच घडतंय. अभय समोर आला, कि सारखा त्याचाच विचार येतोय मनात. माझं मन पाहिल्यासारखंच त्याच्याकडे झेप घेतंय. त्याच्या  ओढीने कासावीस होतंय. तीच हुरहूर परत दाटून येतेय मनात. आणि आताही माझं प्रेम मला त्याचा विचार करण्यापासून थांबवतंय. अडकली आहे पूर्ण मी ह्या द्विधेमध्ये. नक्की काहीच कळत नाहीय मला. काय चाललंय माझं ते. एकीकडे माझं प्रेम आहे आणि एकीकडे हा अभय." ऋतिका बोलता बोलता  मध्येच थांबली. बोलताना तिने आपल्या मनातल्या खूप साऱ्या गोष्टी बाहेर काढल्या होत्या. ज्या तिने कधीच कोणाला बोलून नव्हत्या दाखवल्या. पण शेवटी त्या स्वतःहूनच बाहेर आल्या होत्या. आज पहिल्यांदा तिने आपलं मन मोकळं केलेलं होतं कोणासमोरतरी. अजून तिला खूप काही सांगायचं होतं तिला निखिलला आणि विचारायचं देखील होतं. पण त्याआधी आपल्या मनातलं जे बाहेर येतंय ते आधी तिने मोकळं करायचं ठरवलं. 

          निखिलला हे सगळं अपेक्षितच जणू काही. कारण त्याला पहिल्यापासून हे समजलं होतं. अभय आणि ऋतिका एकमेकांविषयी अगदी सारखाच  विचार करतात. दोघेही एकमेकांना त्याच ओढीने  भेटायचा प्रयत्न करतात पण शेवटी आपल्या लहानपणीच्या प्रेमापायी आणि त्यांना ते माहित नसल्या कारणाने स्वतःला अडवतात. ऋतिकाला अभयबद्दल तितकीच ओढ आहे जितकी अभयला आहे. तिचाही जीव अभयकडे तितकाच ओढला जातो जितका अभयचा तिच्याकडे. जसं अभय तिच्याविषयी बोलायचा  सगळं तसंच अगदी जसाच्या तसं ऋतिकाने निखिलला सांगितलं होतं. आता फक्त ऋतिका कडून चिऊ आणि म्याऊ हे दोन शब्द ऐकायचे होते त्याला. म्हणजे त्याला हे निश्चित झालं असतं कि दोघेही तेच चिऊ आणि म्याऊ आहेत. 

"बरं ऋतिका. चालेल ना डॉक्टर तुम्हाला ऋतिका म्हटलेलं" निखिलला पुढे आणखी जाणून घ्यायचं होतं. म्हणून तो ऋतिकाला तयार करत होता. 

"मी तर तुला तेच सांगतेय कधीपासून. आपण आता मित्र आहोत. मला ऋतिकाच म्हण. पण तूच ऐकत नव्हतास. सारखं तेच डॉक्टर डॉक्टर करत होतास." ऋतिका हलकेच नाक फुगवून म्हणाली. 

"बरं चालेल, मी तुम्हाला ऋतिकाच म्हणेन." निखिल हसत म्हणाला. 

"हो पण ते तुम्ही तुम्ही करतोय ना ते पण बंद कर नाहीतर मग डॉक्टरच ठीक आहे." ऋतिका म्हणाली. 

"नाही ऋतिका.  आता सवय झालीय त्याची त्यामुळे अरेतुरे करणं नाही जमणार नाही मला. मी तुम्हाला हृतिकच म्हणेन पण तुम्ही वगैरे करूनच. शेवटी तुम्ही वाहिनी आहात माझ्या." शेवटचं वाक्य निखिल तोंडातल्या तोंडात म्हणाला म्हणून ते ऋतिकाला ऐकू नाही आलं. 

"हं, बरं ठीक आहे. तुला जमेल तसं." ऋतिका म्हणाली. 

"पुढे काय ऋतिका मग?" निखिलने आणखी जाणून घेण्यासाठी तिला प्रश्न केला. 

"म्हणजे?" ऋतिकाला न कळून तिने विचारले. 

"म्हणजे हेच कि एवढंच आहे तुमच्या मनातलं कि अजून आहे काही." निखिल आपला गुगली टाकत म्हणाला. 

"हो आहे कि, सांगायचं आहे अजून तुला. कारण आज पाहिल्यांदा मी माझं मन मोकळं करतेय. पण त्याआधी थोडी रिफ्रेशमेंटची गरज आहे." ऋतिका असं म्हणून तिने दोन कॉफी आणायला सांगितल्या. निखिलला पण त्याची गरज होतीच म्हणा. 

               पाचच मिनिटांत एकजण दोन वाफाळत्या कॉफीचे मग घेऊन आला. ती कॉफी घेऊन ऋतिकाला जरा तरतरी आली. आणि ती पुढे सांगू लागली. 

"निखिल तुला माहितीय, मी अभयला का टाळतेय?" ऋतिकाने निखिलला प्रश्न केला. त्यावर निखिलने नकारार्थी मन हलवली. 

"कारण माझं पहिलं प्रेम" ऋतिका म्हणाली. 

"अच्छा म्हणजे तुम्ही दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करताय तर, आणि त्याच्यावरच्या प्रेमामुळे तुम्ही अभयला टाळताय. बरोबर ना?" निखिल ऋतिकाच्या बोलण्यात सहभागी होत होता. 

"हो." ऋतिका म्हणाली. 

"मग कोण आहे तो नशीबवान जो तुमचं पाहिलं प्रेम आहे. मला पण एकदा भेटायचं आहे त्याला." निखिल म्हणाला. 

"नाही भेटू शकत तू त्याला. कारण मलाच तो अजून भेटलेला नाहीय." ऋतिका उदास होत म्हणाली. 

"म्हणजे? मी समजलो नाही." निखिल न कळण्याचा आव आणत म्हणाला. 

" म्हणजे,  माझं पाहिलं प्रेम म्हणजे माझा लहानपणीचा मित्र आहे. म्याऊ त्याचं नाव." ऋतिका म्हणाली तसं अभयने जोरात श्वास घेतल्यासारखा आवाज आला. ऋतिकाने आणि निखिलने एकदमच तिकडे बघतीलं आणि त्याच्याजवळ आले. पण कसलीच हालचाल नाही हे पाहून ऋतिकाने त्याला तपासलं. त्यांना वाटलं कि भास झाला असेल, म्हणून ते परत खिडकीजवळ आले. 

तिच्या तोंडून म्याऊ हे नाव ऐकताच निखिलला खात्री पटली, कि ऋतिकाच चिऊ आहे. त्याला खूप आनंद झाला. पण चेहऱ्यावर तसं न दाखवता तो ऋतिकाचं पुढचं बोलणं ऐकू लागलं. तिने निखिलला चिऊ आणि म्याऊबद्दल सगळं सांगितलं. आणि शेवटी म्हणाली,
"आम्ही लहान असताना तो अचानकच तो एक दिवस न सांगता कुठंतरी निघून गेला.  ते अजून त्याचा काहीच पत्ता नाहीय. मी नंतर त्याला खूप शोधलं, पण त्याचा काहीच पत्ता नाही लागला. मग शेवटी त्याला शोधून शोधून तो परत येईल म्हणून मी त्याची वाट पाहण्याचं ठरवलं. अभय जेव्हा भेटला तेव्हा मला एकवेळ असंच वाटलं तोच माझा म्याऊ असावा. त्याच्याशी एकदा बोलेन ह्यावर म्हटलं तर तो परत मला भेटलाच नाही. आणि तो आता काही विचारायच्या अवस्थेमध्ये पण नाहीय. म्हणून मी तुझ्याशी बोलायचं ठरवलं." ऋतिका म्हणाली. 

"हो बरं केलंत ते तुम्ही तुमचं मन मोकळं केलंत ते. कदाचित मी तुमची काही मदत करू शकतो यामध्ये. आपण दोघे मिळून तुमच्या म्याऊला शोधुयात चला." निखिल म्हणाला. 

" थँक यू. पण निखिल तू काय मदत करणार आहेस मला. तू तर त्याला ओळखत पण नाहीस. मलाही माहित नाही कि तो आता कसा दिसतोय. कारण लहानपणीच्या आणि आताच्या म्याऊमध्ये खूप बदल झाला असेल. " ऋतिका म्हणाली. 

"हो. ओळखत नसलो म्हणून काय झालं. तरी पण मी तुमची काही ना काही मदत नक्कीच करू शकतो." निखिलला चान्स सोडायचा नव्हता. कारण तो अगदी जवळ पोचला होता. 

"बरं." असं म्हणून ऋतिका काय करता येईल याचा विचार करू लागली. तिने घडल्यात बघितले तर अजून एक तास होता तिला निघायला. म्हणून त्यावेळेत निखिलची काही मदत होईल का ह्यावर बोलायचं तिने ठरवलं. 

"मी काय म्हणतोय ऋतिका, तुमच्याकडे म्याऊची ओळखीची अशी एखादी काही वस्तू आहे का, कि ज्यावरून आपण त्याला शोधू शकू. म्हणजे त्याचा एखादा फोटो वगैरे असं काही." निखिल म्हणाला. 

"हो आहे. आमच्या दोघांचा लहानपणी एकत्र काढलेला फोटो आहे माझ्या केबिनमध्ये." ऋतिका म्हणाली, "पण त्यावरून कसं शोधता येईल त्याला?" ऋतिकाने प्रश्न केला. 

"येईल नक्कीच. कारण आजच्या घडीला कोणाला शोधणं म्हणजे काही अवघड राहिलेलं नाहीय सोशल मीडियाच्या मदतीने. मला तो फोटो बघता येईल का ऋतिका?" असं म्हणून निखिलने तो फोटो बघायची इच्छा दर्शवली. 

"हो बघता येईल. माझ्या केबिनमध्ये आहे. थांब मी घेऊन येते." असं म्हणून ऋतिका आपल्या केबिनकडे जायला निघाली. तेव्हा निखिल तिला थांबवत म्हणाला,
"ऋतिका, तुम्ही तो फोटो काढून ठेवा. मीच येतो तुमच्या केबिनमध्ये. तुम्ही व्हा पुढे, मी आलोच."

"बरं ठीक आहे. चालेल." असं म्हणून ऋतिका निघून गेली. 

                 ऋतिका निघून गेल्यावर दार बंद झाल्याचे पाहून निखिल अभयजवळ आला. त्याच्या बाजूला बसून त्याने त्याचा सलाईन लावलेला हात हातात घेतला आणि म्हणाला,
"अभय, मित्रा आता तरी तुला उठावंच लागेल लेका. जिच्यासाठी तू एवढे दिवस तडफडत होतास, ती चिऊ आज जवळ आहे तुझ्या. होय ऋतिकाच तुझी चिऊ आहे. मी घेऊन येतोय तुझ्या चिऊला तुला तिच्या म्याऊला भेटायला." असं म्हणून डोळ्यातलं पाणी पुसून निखिल ऋतिकाच्या केबिनच्या दिशेने निघाला. जाताना त्याने अभयच्या लहानपणीचा तो चिऊ आणि म्याऊचा फोटो सोबत घेतला. कारण त्याला खात्री झाली होती कि, ऋतिका जवळ पण हाच फोटो असणार म्हणून. 

              निखिलने दारावर टकटक केले. तेव्हा ऋतिकाने दार उघडंच असल्याचं सांगितलं. निखिल आत आल्यावर त्याने पाहिलं कि, ऋतिका तिच्या खुर्चीवर एक फोटो हातात घेऊन बसली होती. तिचं लक्ष नाही हे पाहून निखिलने आपल्यासोबत आणलेला फोट हळूच आपल्या जॅकेटच्या खिशात लपवला.

             घास खाकरत त्याने ऋतिकाचं लक्ष खेचून घेतलं. फोटो पाहण्यात गुंतलेल्या ऋतिकाला निखिल आल्याचं लक्षातच नव्हतं राहिलं. तिने वरमून निखिलला तो फोटो दाखवण्यासाठी त्याच्याकडे दिला. 

"हा बघ. हाच एक फोटो आहे माझ्याकडे आमचा. लहानपणी खेळत असताना अचानक अभयच्या आजीने तो फोटो काढला होता. माझ्याकडे हा एक फोटो त्यांनीच दिला होता. आमची लहानपणीची एक आठवण म्हणून. आणि ती एकच आठवण माझ्याकडे राहिली होती." ऋतिका म्हणाली. 

            निखिलने  तो फोटो हातात घेऊन बघितला तसं त्याला एखादा खजाना मिळाल्यासारखा आनंद झाला. त्याच्या अपेक्षेप्रमाणे हा सेम तसाच फोटो होता जो अभयजवळ होता. त्याला आता सगळ्या गोष्टी कळून चुकल्या होत्या. आजपर्यंत जेवढ्या काही घटना अभय आणि ऋतिकाच्या बाबतीत घडल्या  होत्या, त्याचा अर्थ त्याला लागला होता. अतिशय आनंदाने उड्या माराव्यात आणि असंच ह्रतिकला घेऊन त्याच्या मित्राकडे अभयकडे घेऊन जावं आणि त्यांना एकमेकांना मिळवावं असं त्याला मनापासून वाटत होतं. पण त्याने आपल्या मनाला आवर  घातला आणि ऋतिकाला ह्याबद्दल सांगण्यासाठी तिच्याकडे वळला. कारण त्याला अजून ऋतिकाला  आणि अभयला लांब ठेवायचं नव्हतं. 

"ऋतिका, हा फोटो बघून मला तर असंच वाटतंय कि तुमचा म्याऊ तुम्हाला नक्की भेटेल." निखिल गूढ हास्य चेहऱ्यावर आणत म्हणाला. 

त्याच्या बोलण्याचा रोख न कळल्यामुळे ऋतिका गोंधळून त्याला म्हणाली,
"निखिल मस्करी नको करुस. हे कसं शक्य आहे कि, लहानपणीच्या फोटोवरून म्याऊ लगेच भेटेल मला. तसं असतं तर आतापर्यंत तो मला भेटायला हवा होता. मग का नाही भेटला? सांग."

"कारण त्याला आता भेटायचं होतं तुम्हाला. म्हणून कदाचित अजूनपर्यंत नसेल भेटला तुम्हाला" निखिल तोच गूढपणा कायम ठेवत म्हणाला. 

"म्हणजे?" ऋतिका गोंधळलेलीच होती. 

"म्हणजे असं कि. . . " आपलं बोलणं मध्येच थांबवत निखिल म्हणाला. त्याला ऋतिकाला सांगायचं होतं पटकन पण तेच जमत नव्हतं त्याला. 

"म्हणजे काय निखिल? बोल लवकर." ऋतिकाच्या हृदयात आता जोरजोरात धडधड करू लागलं होतं. 

"माझ्याकडे तुम्हाला दाखवण्यासाठी एक गोष्ट आहे." निखिल म्हणाला. 

"कुठली गोष्ट?" ऋतिका अधीरतेने म्हणाली. 

"दाखवतो."असं म्हणून  निखिलने आपल्या जॅकेटच्या आतमधून ती  फोटो फ्रेम बाहेर काढली आणि ऋतिकाकडे पाहत म्हणाला,
"दिल थामके रखियेगा ऋतिकाजी आपके लिये एक बोहोत बडा सरप्राईज है."

"बघू" असं म्हणत धडधडत्या काळजाने ऋतिकाने ती फोटो फ्रेम बघितली आणि तिला आश्चर्याचा एक  खूप मोठा धक्का बसला. त्यातच ती जोरात खुर्चीवर बसली. निखिल तिला सावरायला पुढे झाला. तो फोटो बघून तिच्या डोळ्यांतून अश्रू  वाहू लागले. तिला काय बोलावं हेच कळत नव्हतं. आश्चर्याचा आणि सुखाचा धक्का तिला एकदमच बसला होता.  तिला विश्वासच बसत नव्हता, कि आपल्याकडे आहे तसाच फोटो निखिलकडे कसा काय आला? तिने निखिकडे तशाच भरल्या डोळ्यांनी पाहून विचारले,
"हा फोटो तुझ्याकडे कसा आला? हा फोटो आजीने मला आणि म्याऊलाच दिला होता. हा फोटो फक्त म्याऊकडेच असू शकतो. म्हणजे तूच . . . "

निखिलला हे अनपेक्षित होतं. तिच्या प्रश्नाने तो बावचळला आणि म्हणाला,
"नाही नाही ऋतिका, मी नाहीय म्याऊ. मला तो फोटो भेटला होता एकाकडे आणि तो मला तुम्हाला  दाखवायचा होता म्हणून मी तो घेऊन आलो." 

"तू म्याऊ नाहीस मग तुला कोणाकडे हा फोटो भेटला. हा एक अतिशय पर्सनल विषय आहे निखिल. सांग मला तुला हा फोटो कोणाकडे भेटला? कुठे आहे माझा म्याऊ?" ऋतिकाचा आवाज तिच्याही न कळत वाढला होता. 

"ऋतिका, शांत व्हा प्लिज. मी घेऊन जातो तुम्हाला तुमच्या म्याऊकडे. चला माझ्यासोबत. या." निखिल म्हणाला. आता त्यालाही चिऊ आणि म्याऊची भेट लांबवायची नव्हती. पण ऋतिकाने जर तिच्या म्याऊला ह्या अवस्थेमध्ये  बघितलं  तर तिला काय वाटेल हेच निखिलला कळत नव्हतं. आपलं प्रेम इतक्या वर्षांनी आपल्याला भेटणार आणि तेदेखील अशा अवस्थेमध्ये, हा विचार करूनच निखिलला खूप वाईट वाटले. पण निदान ऋतिकाला खात्री तरी पटेल कि अभयच म्याऊ आहे म्हणून आणि ती तिच्या म्याऊला भेटेल तरी. 
 
"हो चल, आता मी नाही राहू शकत. चल. तू म्हणशील तिथे मी यायला तयार आहे माझ्या म्याऊला भेटायला. प्लिज मला एकदा भेटव त्याला." रडवेल्या आवाजात ऋतिका म्हणाली. 

"चला माझ्यासोबत" असं म्हणून निखिलने त्या दोन्ही फोटोच्या फ्रेम्स सोबत घेतल्या आणि ऋतिकाला घेऊन निघाला तिच्या लहानपणीच्या प्रेमाला भेटवायला. 

               ते दोघे अभयच्या रूमजवळ येऊन थांबले. निखिलने पुढे होत त्या रूमचा दरवाजा उघडला आणि ऋतिका त्याच्या मागोमाग आत गेली. निखिलने आपल्याला अभयच्या रूममध्ये का आणलंय हे न समजून ती निखिलला म्हणाली,
"आपण अभयच्या रूम मध्ये कशाला आलोय निखिल? काय म्याऊ इकडे येणार आहे का?"

"इकडे येणार नाहीय ऋतिका तो. तो तर इथेच आहे. दीड महिना झाला. कोमामध्ये आहे तो. तो बघा जो ह्या बेडवर झोपलाय तोच अभय तुमचा म्याऊ आहे." आपल्या डोळ्यांत आलेलं पाणी पुसत निखिल कसाबसा म्हणाला. 

                ऋतिका शॉक बसल्यासारखी एकवेळ अभयकडे आणि निखिलकडे पाहत होती. तिला हसावं कि रडावं तेच कळेना. तिच्या सगळ्या भावना उत्कटतेने अक्षरशः भरून आल्या होत्या. इतक्या कि, जर कोणी तिच्या आतमध्ये डोकावून पाहिलं असतं तर कदाचित त्याला कळलं असतं कि, तिच्या आतमध्ये काय चालू आहे ते. अनाकलनीय अशा भावनांच्या वादळात ती सापडली होती. काहीच न सुचून स्तब्ध झाली होती ती. म्याऊ आपलं लहानपणीचं प्रेम आपल्या समोर आहे. तो अभय आहे. त्याचा ऍक्सीडेन्ट झालाय. गेला दीड महिना झालं तो कोमामध्ये आहे. कधी शुद्धीवर येईल ते माहिती नाहीय. औषधं आणि सलाईन्सवर मशीनमधली त्याच्या आयुष्याची रेषा सुरळीत चालू आहे. नियतीने तिची अजब थट्टा केली होती. तिचं प्रेम तिला परत मिळवून देऊन  पण तिच्यापासून दूरच ठेवलं होतं.  जणू नियतीच्या मनात त्यांचं मिलन होऊ द्यायचं अजून बाकी होतं. 

                ज्याची आपण इतके दिवस, इतकी वर्षं वाट पहिली. तो भेटावा म्हणून उपासतापास केले. सगळ्या देवांना नवस बोलले. त्याच्यावरच्या प्रेमाखातर कुणाकडे ढुंकूनही पाहिलं नाही. फक्त त्याचीच वाट पाहत राहिले आजवर आणि तो आपल्याला भेटावा तेही अशा अवस्थेमध्ये. याआधी तो कितीतरी वेळा आपल्यासमोर आलेला. आपल्याला एकवेळ वाटलं कि, तोच म्याऊ आहे पण आपण कसलीच शहानिशा न करता त्याला का जाऊ दिलं ह्याचाच ती विचार करत होती आणि स्वतःला दोषी मानत होती. जेव्हा आपल्याला तसं वाटलं होतं तेव्हाच का नाही आपण त्याला विचारलं? तिला प्रत्येक गोष्ट आठवत होती. अभय भेटलेला प्रत्येक क्षण तिच्या डोळ्यांसमोर येत होता. तो म्याऊच होता. म्हणूनच आपल्याला त्याच्याबद्दल ती ओढ वाटत होती. त्याच्याशी खूप जुनी ओळख असल्यासारखं वाटत होतं. त्याच्याबद्दल आपुलकी वाटत होती. काळजी वाटत होती. आपल्यामध्ये एक नातं आहे ते वाटत होतं. म्हणूनच तो जेव्हा जेव्हा भेटला तेव्हा तेव्हा आपल्याला त्याच्याबद्दल ती उत्कट भावना जाणवत होती. त्यांच्यात असणाऱ्या त्या अनामिक ओढीचं, त्या अनोळखी प्रेमाचं रहस्य तिला आता उलगडलं होतं. तिचं प्रेम तिला परत भेटलं होतं. तिचा म्याऊ तिला भेटला होता. पण म्याऊला अजून त्याची चिऊ भेटायची बाकी होती.